भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (14 जुलै) हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 42 धावांनी विजय मिळवला. यासोबतच शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघानं झिम्बाब्वेविरुद्धची मालिका 4-1 ने खिशात घातली.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा संघ 18.3 षटकात केवळ 125 धावाच करू शकला. संघाकडून डिऑन मायर्सनं सर्वाधिक 34 धावा केल्या, तर तदिवनाशे मारुमणी आणि फराज अक्रम यांनी 27-27 धावा केल्या. भारतीय संघानं आज अचूक गोलंदाजी होती. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनं 22 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय शिवम दुबेला 2 बळी मिळाले. तुषार देशपांडे, अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 1-1 बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 6 गडी गमावून 167 धावा केल्या होत्या. एकवेळ टीम इंडियानं 40 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी 56 चेंडूत 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं.
संजूनं 45 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली, ज्यात त्यानं 4 षटकार आणि 1 चौकार लगावला. तर परागनं 22 धावा केल्या. शेवटी शिवम दुबेनं 12 चेंडूत 22 धावा ठोकल्या. झिम्बाब्वेसाठी ब्लेसिंग मुझाराबानीनं शानदार गोलंदाजी करत 2 बळी घेतले. तर कर्णधार सिकंदर रझा, रिचर्ड नगारावा आणि ब्रेंडन मावुता यांना प्रत्येकी 1-1 बळी मिळाला.
या सामन्यासाठी भारतीय संघात 2 बदल करण्यात आले होते. कर्णधार गिलनं वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि रियान पराग यांना खेळण्याची संधी दिली. तर ऋतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांना बाहेर बसवण्यात आलं. झिम्बाब्वेच्या संघात तेंडाई चताराच्या जागी ब्रेंडन मावुताला स्थान देण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! एका चेंडूत 13 धावा ठोकल्या…!! टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
जय शाहंच्या या 3 निर्णयांनी वाढला बीसीसीआय बद्दलचा आदर, जाणून घ्या संपूर्ण कहाणी
कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा