भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साऊथॅम्पटन येथे आयसीसी जागतिक कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंडने जिंकत इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमधील न्यूझीलंड संघ पहिला विश्वविजेता बनला. न्यूझीलंडने भारताचा अंतिम सामन्यात ८ विकेट्सने पराभव केला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
भारताला मात्र, पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत पराभवाचं तोंड पाहायला लागले. गेल्या ८ वर्षांत भारतीय संघ सातत्याने आयसीसी विजेतेपदाच्या जवळ जाऊनही अपयशी ठरला आहे. या लेखातून आपण भारताच्या सर्व संघांची गेल्या ८ वर्षांतील आयसीसी स्पर्धांतील कामगिरी जाणून घेऊ
मागील ८ वर्षात भारतीय संघाला सातत्याने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतरही विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. मागील ८ वर्षांत भारतीय संघाने २०१८ चा १९ वर्षांखालील विश्वचषक वगळता जवळ जवळ सर्व आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम सामन्यात पराभव स्विकारला आहे.
साल २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात युवा भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते. या विश्वचषकाचा अपवाद वगळता २०१४ च्या टी२० विश्वचषकापासून भारतीय संघ आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
भारताने २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अपवाद वगळता शेवटचे २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर भारतीय वरिष्ठ पुरुष संघाने ६ आयसीसीच्या स्पर्धा खेळल्या. विशेष म्हणजे यातील सर्व स्पर्धांमध्ये भारतीय संघाने उपांत्य किंवा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र विजेतेपद मिळवण्यात अपयश आले.
विशेष म्हणजे २३ जून २०१३ रोजीच भारतीय पुरुष संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि बरोबर ८ वर्षांनी २३ जून २०२१ रोजीच भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
तसेच माहिला संघाने या कालावधीत जवळपास ६ आयसीसीच्या स्पर्धा खेळल्या यातील ३ स्पर्धांमध्ये साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. तर २०१७ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आणि नंतर २०१८ च्या टी२० विश्वचषकात उपांत्य सामन्यात पराभूत व्हावे लागले. तर २०२० साली झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
त्याचबरोबर युवा भारतीय संघ २०१४, २०१६, २०१८ आणि २०२० असे चार १९ वर्षांखालील विश्वचषक गेल्या ८ वर्षात खेळला. यातील मागील ३ विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला, मात्र त्यातील केवळ २०१८ ला भारताला विजेतेपद मिळवता आले. तर २०१४ च्या विश्वचषकात भारतीय संघ ५ व्या स्थानावर राहिला.
अशी आहे मागील ८ वर्षांतील आयसीसी स्पर्धांमधील भारतीय संघाची कामगिरी –
२०२१ –
कसोटी अंजिंक्यपद स्पर्धा – अंतिम सामना (पराभूत)
२०२० –
१९ वर्षांखालील विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
महिला टी२० विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
२०१९ –
पुरुष वनडे विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
२०१८ –
महिला टी20 विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
१९ वर्षांखालील विश्वचषक – विजेतेपद
२०१७ –
महिला वनडे विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
चॅम्पियन्स ट्रॉफी – अंतिम सामना (पराभूत)
२०१६ –
१९ वर्षांखालील विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
महिला टी२० विश्वचषक – साखळी फेरी आव्हान संपुष्टात
पुरुष टी२० विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
२०१५ –
पुरुष वनडे विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
२०१४ –
१९ वर्षांखालील विश्वचषक – ५वे स्थान
महिला टी२० विश्वचषक – साखळी फेरी आव्हान संपुष्टात
पुरुष टी२० विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
२०१३ –
महिला वनडे विश्वचषक – साखळी फेरी आव्हान संपुष्टात
चॅम्पियन्स ट्रॉफी – विजेतेपद
महत्त्वाच्या बातम्या –
अन् वॉटलींगच्या दैदिप्यमान कारकिर्दीवर WTC चा सुवर्णकलश चढला
‘या’ कारणामुळे विराट WTC मध्ये फ्लॉप; माजी दिग्गजांनी दाखवून दिली कोहलीची चूक