ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने द गॅबा मैदानावर शनिवारी (११ डिसेंबर) इंग्लंड संघाचा ऍशेस २०२१-२२ मालिकेतील पहिल्या सामन्यात तब्बल ९ विकेट्सने पराभव केला. याबरोबरच मालिकेत महत्त्वपूर्ण १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, ऑस्ट्रेलिया संघासाठी ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमला बालेकिल्ला का मानले जाते. या मैदानावर गेल्या ३३ वर्षांतील ऑस्ट्रेलियाचा हा २५ विजय आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या ३३ वर्षांत या मैदानावर केवळ एक पराभव स्वीकारला आहे.
भारताने द गॅबावर केले होते ऑस्ट्रेलियाला चीत
ऑस्ट्रेलियाने १९८८ नंतर द गॅबा स्टेडियमवर आत्तापर्यंत ३३ कसोटी सामने खेळले आहेत. या ३३ वर्षांतील ३३ सामन्यांत ऑस्ट्रेलियाने २५ सामने जिंकले आहेत, तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. याबरोबरच ऑस्ट्रेलियाला केवळ एका सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा हा एकमेव पराभव भारतीय संघाने केला आहे. विशेष म्हणजे हा पराभव भारतीय संघाने याचवर्षाच्या सुरुवातीला केला होता.
त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाच्या गॅबामध्ये तब्बल ३२ वर्षे अपराजीत राहाण्याच्या विक्रमाला खंडीत केले होते. त्याआधी तब्बल द गॅबावर खेळल्या गेलेल्या ३१ सामन्यांत ऑस्ट्रेलिया अपराजीत होते. अखेर भारताविरुद्धच्या पराभवानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत करत गॅबावर विजयी पताका फडकवली आहे.
Victory scenes at the Gabba.#AUSvIND pic.twitter.com/Z5nB9MyPwh
— BCCI (@BCCI) January 19, 2021
भारताचा द गॅबावर ऐतिहासिक विजय
भारतीय संघाने २०२०-२१ साली ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील अखेरचा सामना द गॅबा येथे झाला होता. या सामन्यापूर्वी मालिकेत १-१ अशी बरोबरी होती. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी मालिका विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पण, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील हा सामना गॅबावर होत असल्याने अनेकांनी ऑस्ट्रेलियाच विजयासाठी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले होते. मात्र, भारतीय संघाने हे अंदाज चूकीचे ठरवत ३ विकेट्सने विजय मिळवला होता.
या सामन्यातऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकूर (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते.
प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली होती. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली होती, तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले होते. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मलानची विकेट घेताच लायनची ३ मोठ्या विक्रमांना गवसणी; अश्विन, मुरलीधरनच्या पंक्तीत स्थान
पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड चारीमुंड्या चीत! यजमानांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय