कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने १८ धावात ३ विकेट्स घेऊन महत्वाची कामगिरी बजावली. तर बांग्लादेशकडून शब्बीर रेहमानने अर्धशतकी खेळी करत एकाकी लढत दिली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारतीय गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटोन दासला(११) बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर चहलच्या गोलंदाजीपुढे बांग्लादेश फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्याने नियमित कालांतराने बांग्लादेशच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्यामुळे बांग्लादेशची अवस्था ४ बाद ६८ धावा अशी झाली.
त्यानंतरही रहमानने त्याचा खेळ चालू ठेवला होता. पण त्याला बाकी फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. त्याने ५० चेंडूत ७७ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. अखेर त्याला जयदेव उनाडकटने त्रिफळाचित करून बाद केले.
बांग्लादेशकडून तमिम इक्बाल(१५), सौम्या सरकार(१), मुशफिकूर रहीम(९), महमुदूल्लाह रीयाद(२१), शाकिब अल हसन(७), मेहेदी हसन(१७*), रूबेल हुसेन(०) आणि मुस्तफिजूर रहमान(०) यांनी धावा केल्या.
भारताकडून युजवेंद्र चहल(१८/३), जयदेव उनाडकट(३३/२) आणि वॉशिंग्टन सुंदर(२०/१) यांनी विकेट्स घेत बांग्लादेशला ८ बाद १६६ धावांवर रोखले.




