ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या. विराट कोहली व हार्दिक पंड्या यांनी झळकावलेली अर्धशतके भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरले.
अंतिम सामन्याचे तिकीट पक्के करण्यासाठी असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या विरोधात गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने या सामन्यात एकही बदल केला नाही. तर इंग्लंडने या सामन्यासाठी ख्रिस जॉर्डन व फिल सॉल्ट यांना संधी दिली.
प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. राहुल केवळ पाच धावा काढून माघारी परतला. कर्णधार रोहित जम बसल्यानंतर 27 तर सूर्यकुमार यादव 14 धावा करून बाद झाले. एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील चौथे अर्धशतक ठरले. तसेच यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने 50 धावांची खेळी केली. यामध्ये 4 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यानंतर अपयशी ठरत असलेल्या हार्दिक पंड्याने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने अखेरच्या तीन षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरच्या चेंडूवर हिट विकेट होण्याआधी 33 चेंडूवर 63 धावा केल्या. इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डन याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या विजयाने आयसीसी ट्रोल; चाहत्यांनी म्हटले, ‘दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला पंचांच्या मदतीने…’
टी20मध्ये सर्वाधिक शतके, 14 अर्धशतके; इंग्लंडविरुद्ध भारताने पाडला धावांचा पाऊस, जाणून घ्या अव्वल कोण?






