दुबई येथे सुरू असलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या अंतिम सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ९ गडी राखून मोठा विजय मिळवला. याचबरोबर भारताच्या युवा संघाने तब्बल पाचव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाने प्रभावित झालेला हा सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला होता. भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरी पुढे श्रीलंकेचे फलंदाज ढेपाळले. महाराष्ट्राचा गोलंदाज विकी ओत्सवाल याने दमदार कामगिरी करत तीन बळी मिळवले. तर, महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू कौशल तांबे याने देखील दोन बळी आपल्या नावे केले. ३८ षटकांच्या अखेरीस ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १०६ धावा बनवल्या.
प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात खराब झाली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हरनूर सिंग केवळ ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर, अंगक्रिश रघुवंशी याने ५६ व शेख रसिकने ३१ धावा बनवत संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्या दोघांनी अखेरपर्यंत नाबाद राहत विजय मिळवून दिला. सामनावीर पुरस्कार शानदार फलंदाजी करणाऱ्या विकी ओत्सवाल याला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-