बेंगलोर। येथे चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५० षटकात ५ बाद ३३४ झाली आहे. ऑस्ट्रलियाच्या सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरचा या मोठ्या धावसंख्येत सिंहाचा वाटा आहे. ऑस्ट्रलियाचा दुसरा सलामीवीर फलंदाज अॅरॉन फिंचचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतील या चौथ्या सामन्यात पावसाचे सावट होते पण इथे वेगळेच काही तरी घडले ते म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी चिन्नस्वामींच्या या मैदानावर धावांचा पाऊस पडण्यास सुरुवात केली. भारताच्या गोलंदाजांना डावाच्या ३५ षटकापर्यंत एकही यश मिळाले नव्हते. डेविड वॉर्नरचे शतक झाल्यानंतर अॅरॉन फिंचही शतकाकडे वाटचाल करत होता. पण पार्टटाइम गोलंदाज केदार जाधवने १२४ धावांवर वॉर्नरला बाद केले तर ९४ धावांवर उमेश यादवने अॅरॉन फिंचला तंबूत परत पाठवले.
एका वेळेला असे वाटत होते की ऑस्ट्रेलियाची धावा संख्या सहज ४०० धावांच्या पार जाईल पण भारताच्या गोलंदाजांनी डाव सावरला आणि ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजांनंतर बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. पीटर हँडकॉम्बने ३० चेंडूत ४३ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ३३४ पर्यंत नेला.
भारताकडून उमेश यादवने ४ विकेट्स घेतल्या तर केदार जाधवने १ विकेट घेतली. बेंगलोरचे हे मैदान मोठ्या धावांसाठी प्रसिद्ध आहे. या आधी ही २०१३ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात असाच धावांचा पाऊस पडला होता. त्या सामन्यात भारताच्या रोहित शर्माने २०९ धावा केल्या होत्या. आता भारताला सामना जिंकण्यासाठी ३३५ धावा कराव्या लागणार आहेत. यासाठी भारताच्या सलामीच्या जोडीने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.