दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश संघात(India vs Bangladesh) 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना(1st T20I) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
पण दिवाळीनंतर दिल्लीतील हवा प्रदुषणात(Air pollution) वाढ झाली आहे. त्यामुळे हा टी20 सामना दिल्लीतून हलवण्यासाठी मागणी होत होती.
त्याचबरोबर काही पर्यावरण तज्ज्ञांनीही बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुलीला(Sourav Ganguly) पत्र लिहून हा सामना दिल्लीतून(Delhi) दुसऱ्या शहरात हलवण्याची विनंती केली होती.
पण आता गांगुलीनेच हा सामना ठरल्याप्रमाणे दिल्लीतच पार पडेल, हे स्पष्ट केले आहे. एएनआयने गांगुलीला याबदद्ल विचारल्यानंतर तो म्हणाला, ‘हा सामना दिल्लीतच होईल.’
तसेच हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार याप्रकरणाबद्दल दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी म्हणाले, ‘आम्ही पत्राबद्दल ऐकले पण याबद्दल बीसीसीआयकडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. खरं तर आम्हाला रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. या सामन्यासाठी ब्रॉडकास्टरही उद्या येणार आहेत.’
रविवारी(3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.






