आजपासून (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका(T20I Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
दिल्लीमध्ये प्रदुषण मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा परिणाम अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनाने(डीडीसीए) सामन्याच्या एक दिवसाअगोदर पाण्याचे टँकर आणून मैदानावर पाण्याचा शिडकाव केला आहे. जेणेकरुन धूळ उडणार नाही आणि हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
मोठा रबरी पाईप आणून अरुण जेटली स्टेडियमच्या गेट क्रमांक 1,2,3 आणि 6वर पाण्याचा शिडकाव करण्यात आला. तसेच, स्टेडियमजवळील झाडे, स्टेडियमच्या भिंती, शेजारी असणाऱ्या गार्डन, विरेंद्र सेहवाग गेट आणि अंजुम चोप्रा गेटवरही पाण्याचा शिडकाव करण्यात आला.
https://twitter.com/aritram029/status/1190554537884606464
दिवाळीनंतर दिल्लीतील हवा प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे दिल्ली प्रशासनाने 5 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचीही सक्ती करावी लागली आहे.
प्रदुषणाच्या कारणामुळेच आज दिल्लीत होणारा सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी काही दिवसांपूर्वी होत होती. मात्र शेवटच्या मिनिटाला मैदान बदलण्याचे शक्य नसल्याचे सांगत दिल्लीत होणाऱ्या सामन्याला बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Saurav Ganguli) ग्रीन सिग्नल दिला आहे.
‘आम्ही 28 ऑक्टोबरला दिल्लीत आलो. सामन्याची तयारीही करण्यात आली होती. त्यामुळे काही गोष्टी करण्यासाठी खूप उशीर झाला होता. दिवाळीनंतरचा काळ हा उत्तर भारतासाठी कठीण असतो. तेथे धुके, धूळ आणि बऱ्याच समस्या निर्माण होतात.’
‘भविष्यात या मोसमात जेव्हा आम्ही उत्तर भारतात सामन्यांचं आयोजन करु तेव्हा आम्ही अधिक व्यावहारिकतेने विचार करु,’ असे बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली म्हणाले.






