ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक विजयानंतर आता भारतीय संघ इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज होतो आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत येत्या ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्या चार सामन्यांची कसोटी मालिका भारतात खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी आता ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने भारताच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे.
हॉगच्या मते आगामी कसोटी मालिका भारतीय संघ ४-० अथवा ३-१ अशा फरकाने सहज खिशात घालेल. हॉगने आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना हे वक्तव्य केले.
“चेन्नईतील सामन्यात असेल भारताचे वर्चस्व”
आगामी भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेबाबत भाष्य करताना हॉग म्हणाला, “माझ्या मते ही मालिका ४-० किंवा ३-१ अशा फरकाने भारतीय संघ आरामात जिंकेल. माझ्या मते इंग्लंडला अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटीत जिंकण्याची संधी असेल. मात्र चौथ्या सामन्यात भारतीय संघ पुन्हा एकदा पुनरागमन करून मालिकेवर आपले नाव कोरेल.”
पहिल्या दोन सामन्यात भारतच विजय मिळवेन असं म्हणत हॉग म्हणाला, “चेन्नईतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघच विजय मिळवेन. तिथे इंग्लंडला माझ्या दृष्टीने कुठलीही संधी नसेल. इंग्लंडला अहमदाबादमध्येच जिंकण्याच्या अधिक शक्यता उपलब्ध आहेत.”
दरम्यान, ५ फेब्रुवारीपासून सुरु होणारी ही कसोटी मालिका कोरोनामुळे दोनच मैदानांवर खेळवण्यात येणार आहे. अनुक्रमे ५ आणि १३ फेब्रुवारी रोजी पहिल्या दोन कसोटी सामन्यांना चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ फेब्रुवारी आणि ४ मार्च पासून अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२० : राहुलच्या गोलमुळे ब्लास्टर्सने गोव्याला रोखले
या भारतीय खेळाडूंच्या नावे आहेत आश्चर्यकारक विश्वविक्रम
भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू अजूनही प्राथमिक शाळेतच, माजी दिग्गजाचा घरचा आहेर