टीम इंडिया 5 जून (बुधवार) रोजी आयर्लंडविरुद्ध आपल्या टी20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. उभय संघांमधील हा सामना रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून पॉल स्टर्लिंगकडे आयर्लंडची धुरा असेल. कागदावर जरी भारतीय संघ वरचढ दिसत असला, तरीही सामन्यात आयर्लंडला हलक्यात घेणं परवडणारं नाही. आयर्लंड संघात असे पाच स्टार खेळाडू आहेत, जे भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात.
पॉल स्टर्लिंग – आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. स्टर्लिंगनं 142 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 27.60 च्या सरासरीनं 3589 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. फक्त विराट कोहली, रोहित शर्मा आणि बाबर आझम यांनी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये स्टर्लिंगपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याशिवाय स्टर्लिंगनं आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 20 विकेट्सही घेतल्या आहेत.
अँड्र्यू बालबिर्नी – आयर्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीनं 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. या उजव्या हाताच्या अनुभवी फलंदाजावर भारताविरुद्ध चांगला खेळ दाखवण्याची जबाबदारी असेल. अँड्र्यू बालबर्नीनं 107 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 23.93 च्या सरासरीनं 2370 धावा केल्या आहेत.
जोशुआ लिटिल – वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल हा तुमच्या परिचयाचा असेल. तो आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. लिटलनं आयर्लंडसाठी आतापर्यंत 66 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 23.25 च्या सरासरीनं 78 विकेट्स घेतल्या आहेत.
कर्टिस कॅम्फर – 25 वर्षीय अष्टपैलू कर्टिस कॅम्फर देखील भारताला अडचणीत आणू शकतो. कॅम्फरनं 53 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21.73 च्या सरासरीनं 826 धावा केल्या असून 29 बळीही घेतले आहेत. 2021 मध्ये यूएईमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात कॅम्फरनं नेदरलँड विरुद्ध 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या होत्या.
गॅरेथ डेलेनी – गॅरेथ डेलेनी हा आपल्या अष्टपैलू खेळानं भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. 2019 मध्ये पदार्पण केल्यापासून तो आयर्लंडच्या टी20 संघाचा नियमित सदस्य आहे. डेलनीनं 72 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 20.73 च्या सरासरीनं 1016 धावा केल्या आहेत, ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. डेलानीनं आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 44 विकेट्सही घेतल्या आहेत.
भारत विरुद्ध आयर्लंड हेड टू हेड
भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्ध विक्रम खूपच चांगला आहे. आयर्लंडविरुद्ध भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या दोन संघांमध्ये एकूण 7 टी20 सामने झाले, ज्यापैकी टीम इंडियानं सर्व सामने जिंकले आहेत. याशिवाय भारतानं 3 एकदिवसीय सामन्यांमध्येही विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
93 कोटींची एकूण बक्षीस रक्कम, विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव; टी20 विश्वचषकातून कोणताही संघ रिकाम्या हातानं परतणार नाही!
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 3 रोमांचक सुपर ओव्हर्स! न्यूझीलंडचा दोनदा झालाय पराभव
जर सुपर ओव्हरही टाय झाला तर मॅचचा निकाल कसा लागेल? नियम जाणून घ्या