भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी रोमहर्षकरीत्या अनिर्णित राहिली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला ९ विकेट्सची गरज होती. दुसरीकडे, न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावा करायच्या होत्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ विजयाच्या जवळ आला होता. भारतीय संघाने ९ विकेट्स घेतल्या. मात्र, शेवटच्या गड्यासाठी रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी शेवटच्या षटकांपर्यंत फलंदाजी केली. त्यानंतर शेवटच्या क्षणी खेळ खराब प्रकाश असल्यामुळे थांबवण्यात आला. अशाप्रकारे न्यूझीलंडने भारताला विजयापासून रोखत मालिकेत पिछाडीवर पडण्यापासून स्वतःला वाचवले. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. रवींद्रने ९१ चेंडूत १८ धावा करून नाबाद राहिला. तर, भारताकडून रवींद्र जडेजाने ४० धावांत ४ बळी घेतले.
या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ३४५ धावा केल्या होत्या. भारताकडून श्रेयस अय्यरने पदार्पणातच शतक झळकावले. तर शुबमन गिल आणि रवींद्र जडेजाने अर्धशतके पूर्ण केलेली. यानंतर विल यंग आणि टॉम लॅथमच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड संघ २९६ धावांवर गारद झाला. भारताला ४९ धावांची आघाडी मिळाली. भारताने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २३४ धावांवर घोषित केला आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडची एक विकेटही घेतली होती. या अनिर्णित कसोटीनंतर चार सकारात्मक गोष्टी पुढे आल्या आहेत.
१. श्रेयस अय्यरची शतकी खेळी
भारताच्या विजयाचा पाया रचण्याचे काम श्रेयस अय्यरने केले. कसोटी पदार्पण करणाऱ्या अय्यरने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने अवघ्या ५१ धावांत ५ विकेट गमावल्या. तेव्हा पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. अय्यरने पहिल्या डावात १०५ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या.
२. खालच्या फळीची भक्कम भागीदारी
दुसऱ्या डावात भारतीय संघ अडचणीत सापडला होता आणि सामना वाचवण्यासाठी भागीदारीची गरज होती. संघाची वरची फळी अपयशी ठरली, त्यानंतर खालच्या फळीने मोर्चा सांभाळला. श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, रिद्धिमान साहा आणि अक्षर पटेल यांनी साथ देत संघाला २३४ धावांपर्यंत नेले. या तिघांनी मिळून १२१ धावांचे योगदान दिले.
३. केन विलियम्सन
या सामन्यात भारताला दडपणाखाली आणून न्यूझीलंडला सामना जिंकण्याची संधी होती. सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातच भारताने ४ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी संघाची धावसंख्या ५ विकेटवर केवळ ५१ धावा अशी झाली होती. भारताची आघाडी केवळ १०० धावांची होती. अशा स्थितीत न्यूझीलंडच्या कर्णधाराला आक्रमणाची संधी होती. मात्र, टीम साऊथी आणि कायले जेमिसनला गोलंदाजी देण्याऐवजी न्यूझीलंडच्या कर्णधाराने अप्रभावी फिरकी गोलंदाज विल समरविलला गोलंदाजी दिली आणि भारताने कठीण परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढले.
४. फिरकी गोलंदाजांची कामगिरी
या सामन्यासाठी अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये ३-३ फिरकीपटू ठेवले होते. भारतासाठी अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर यांच्यावर जबाबदारी होती. तर न्यूझीलंडसाठी एजाज पटेल, विल समरविल आणि नवोदित रचिन रवींद्र यांच्यावर जबाबदारी होती. भारताच्या अनुभवी फिरकी त्रिकुटाने दोन्ही डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताकडून वेगवान गोलंदाज उमेश यादवने दोन्ही डावात केवळ २ बळी घेतले. उर्वरित १७ विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. त्या तुलनेत न्यूझीलंडचे कमी अनुभवी फिरकीपटू कोणताही प्रभाव पाडू शकले नाहीत. भारताच्या दोन्ही डावात पडलेल्या १७ विकेटपैकी फक्त ३ विकेट फिरकीपटू एजाज पटेलच्या वाट्याला आल्या.