भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी २८० धावांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे भारताला विजयासाठी न्यूझीलंडचे ९ विकेट्स घेणे आवश्यक आहे. अशात भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू वसीम जाफरने पाचव्या दिवशीच्या खेळाविषयी अंदाज व्यक्त केला आहे.
जाफर याविषयी एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, २७५ धावा शेवटच्या दिवशी करणे नेहमीच अवघड असते. भारतीय संघाला शक्यतो हे माहीत होते, त्यामुळे त्यांनी डाव घोषित केला. जर न्यूझीलंड धावा करायला गेला, तर ते (भारत) खुश होतील. त्यांना विकेट घेण्याची संधी मिळेल.’
ते पुढे बोलताना म्हणाले की, अशा प्रकारच्या खेळपट्टीवर, जर कोणी फक्त बचाव करायला गेले, तर अडचण येते. भारताला माहीत आहे की, न्यूझीलंड संघ सामना अनिर्णित करण्यासाठी खेळेल. त्यांच्या फलंदाजांसमोर तीन ते चार क्षेत्ररक्षक असतील. येथून न्यूझीलंडसाठी सामना संपला असेल.
दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी भारताविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या प्रदर्शनामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. भारताने पाच विकेट्स अवघ्या ५१ धावांवर गमावले होते. श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा भारतीय संघासाठी महत्वाची खेळी केली. त्याने पहिल्या डावात १०५ धावा केल्या, तर चौथ्या दिवशी खेळलेल्या दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने देखील अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या मदतीने भारताने सात विकेट्सच्या नुकसानावर २३४ धावांचा टप्पा गाठला आणि न्यूझीलंसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी भारताने न्यूझीलंड संघाचा एक विकेट देखील मिळवला.