भारत आणि श्रीलंकेच्या (India and Shrilanka) संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाचा थरार सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या पुरुष क्रिकेट संघाला भारताविरुद्ध खेळण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बहिष्काराचा परिणाम महिला क्रिकेटवर झालेला नाही.
13 फेब्रुवारीपासून एसीसी महिला आशिया कप ‘रायझिंग स्टार्स’ स्पर्धेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी पाकिस्तानने पुरुष विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार जाहीर केला, त्याच दिवशी त्यांनी या आशिया कपसाठी आपला महिला संघही जाहीर केला. पाकिस्तान महिला ‘अ’ संघ 15 फेब्रुवारीला बँकॉक येथे भारत महिला ‘अ’ संघाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यावर कोणताही बहिष्कार टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत.
महिला आशिया कप टी-20 स्पर्धा थायलंडची राजधानी बँकॉक येथे खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 15 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता सुरू होईल. योगायोगाची गोष्ट म्हणजे, पुरुषांचा भारत-पाक सामनाही त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता होणार होता, ज्यावर सध्या वादाचे सावट आहे.
आशिया कपसाठी भारतीय महिला संघ (स्क्वॉड):
राधा यादव (कर्णधार), हुमैरा काजी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दीया यादव, तेजल हसब्निस, नंदनी कश्यप (यष्टीरक्षक), ममता एम (यष्टीरक्षक), सोनिया मेंढिया, मिन्नू मणि, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकोर, जिन्तामणी कलिता, नंदिनी शर्मा.






