Champions Trophy 2025 :- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) तणाव वाढला आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानला न जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय भारत सरकारच घेईल. जर भारताने पाकिस्तानचा दौरा केला नाही तर ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत ही स्पर्धा श्रीलंका किंवा अमेरिकेत आयोजित केली जाऊ शकते.
आयसीसी बोर्डाची बैठक कोलंबोमध्ये होत असून, त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतची परिस्थिती काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकते. गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकातही भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आशिया कप आयोजित करण्यात आला. जर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही तर भारताविरुद्धचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने श्रीलंका किंवा अमेरिकेला हलवले जाऊ शकतात.
यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष खलील महमूदने भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर आशियातील इतर काही देश पाकिस्तानात येण्यास नकार देतील असे म्हटले आहे. पीटीआयशी बोलताना खलील महमूदने म्हटले की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सर्वांत श्रीमंत बोर्ड आहे आणि त्यांचा जगभरात दबदबा आहे. जर त्यांनी संघ पाकिस्तानला पाठवला नाही तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांसारखे देश देखील त्यांच्या मार्गावर जातील याची मला कल्पना आहे. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे महत्त्व कमी होईल. अशाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खर्च वाढेल आणि नफा कमी होईल.”
पुढे बोलताना खलील महमूद म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बीसीसीआयच्या सल्ल्याने निर्णय घेते. आयसीसीमध्ये भारताचा जास्त दबदबा आहे, त्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावीच लागेल. बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवत नाही जेणेकरून आमची आर्थिक बाजू मजबूत होईल. भारतीय संघ तटस्थ ठिकाणी खेळल्यास पाकिस्तानात होत असलेल्या आयसीसी स्पर्धेला फार महत्त्व राहणार नाही”, असेही खलील महमूदने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!
आश्चर्यकारक! षटकार मारल्यानंतर खेळाडूला केलं बॅन, क्रिकेटमध्ये हा कुठला आगळा-वेगळा नियम
मितांश, यशश्रीची हॉकी महाराष्ट्र सब-ज्युनियर संघांच्या कर्णधारपदी निवड