मुंबई | भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघात सुरु असलेल्या वनडे मालिकेत आज वानखेडे स्टेडियमवर भारताने इंग्लंडवर ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. तसेच ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. परंतु त्यांना ४३.३ षटकांत सर्वाबाद १६१ धावांपर्यंतच मजल मारली. यात झुलन गोस्वामी आणि शिखा पांडेने प्रत्येकी ४ तर पुनम यादवने २ विकेट्स घेतल्या.
यानंतर मैदानात १६२ धावांच लक्ष घेऊन आलेल्या टीम इंडियाने ४१.१ षटकांत हे लक्ष पार केले. यात सलामीवीर जेमिना रोड्रीगेज ० धावेवर बाद झाल्यानंतर स्मृती मंधानाने पुनम राऊत बरोबर ७३ धावांची शानदार भागीदारी केली. राऊत ३२ धावांवर बाद झाल्यानंतर मंधानाने मिथाली राजसोबत ६६ धावांची भागीदारी केली.
मंधानाची खेळी ६३ धावांवर संपुष्टात आली. तीने ७४ चेंडूत ही खेळी करताना ७ चौकार आणि १ षटकार मारला. यानंतर मिथाली राज आणि दिप्ती शर्माने कोणतीही पडझड होऊ न देता संघाला ७ विकेट्सने शानदार विजय मिळवुन दिला. मिथाली राजने या खेळीत नाबाद ४७ धावा केल्या.
वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २८ जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथेच होणार आहे.






