इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यात आज(16 नोव्हेंबर) भारताने तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडीही घेतली आहे.
या सामन्यात भारताने आज पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 343 धावांची आघाडी घेतली होती. भारताच्या या डावानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला केवळ सर्वबाद 213 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात डावाने पराभव स्विकारावा लागला.
बांगलादेशकडून त्यांच्या दुसऱ्या डावात मुशफिकुर रहिमने एकाकी झुंज दिली. त्याने 150 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तसेच ही खेळी करताना त्याने लिटॉन दास(35) बरोबर 62 धावांची भागीदारी रचली.
दास बाद झाल्यावर त्याने मेहदी हसनला(38) बरोबर घेत 59 धावांची भागीदारी रचली. मात्र हसनला उमेशने बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मात्र बांगलादेशच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.
भारताकडून या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 3 विकेट्स, उमेश यादवने 2 विकेट्स आणि इशांत शर्माने 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी भारताकडून पहिल्या डावात सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने द्विशतक करताना 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 8 षटकार मारले.
त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने 86 धावांची, चेतेश्वर पुजाराने 54 धावांची आणि रविंद्र जडेजाने नाबाद 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला आणि 343 धावांची आघाडी घेतली.
या डावात बांगलादेशकडून गोलंदाजी करताना अबू जाएदने सर्वाधिक 4 विकेट्स आणि इबादत हुसेन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद झाला होता.
संक्षिप्त धावफलक –
बांगलादेश पहिला डाव – सर्वबाद 150 धावा
(बांगलादेश – मुशफिकुर रहिम – 43 धावा, भारत – मोहम्मद शमी – 3 विकेट्स)
भारत पहिला डाव – 6 बाद 493 धावा (घोषित)
भारत – मयंक अगरवाल – 243 धावा, बांगलादेश – अबु जाएद – 4 विकेट्स)
बांगलादेश दुसरा डाव – सर्वबाद 213 धावा
(बांगलादेश – मुशफिकुर रहिम – 64 धावा, भारत – मोहम्मद शमी – 4 विकेट्स)