इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मॅंचेस्टर येथे खेळला गेला. भारतीय संघाने पाच गड्यांनी हा सामना जिंकत मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. अष्टपैलू हार्दिक पंड्या व यष्टिरक्षक रिषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
ओव्हल येथील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना यजमान इंग्लंडने आपल्या नावे केला. त्यामुळे तिसऱ्या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले होते. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या सामन्यात सहभागी झाला नाही. त्याच्याजागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली. सिराजने या संधीचे सोने केले. त्याने आपल्या पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टो व जो रूट यांना एकही धाव न करू देता तंबूत पाठवले. त्यानंतर, बेन स्टोक्स व जेसन रॉय यांनी इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. हार्दिक पंड्याने एकाच षटकात या दोघांना बाद केले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने अर्धशतक करून इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येकडे नेले. मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड विली यांनी उपयुक्त योगदान दिल्याने इंग्लंड २५९ पर्यंत मजल मारू शकला. भारतासाठी हार्दिकने चार तर चहलने तीन बळी मिळवले.
इंग्लंडने दिलेल्या २६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन हे अवघ्या ३८ धावांवर माघारी परतले. सूर्यकुमार यादव ही फारसे योगदान देऊ शकला नाही. मात्र, त्यानंतर रिषभ पंत व हार्दिक पंड्या यांनी १३३ धावांची भागीदारी रचली. हार्दिकने ७१ धावा केल्या. रिषभने अखेरपर्यंत नाबाद राहत आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक ठोकले. त्याने रविंद्र जडेजाच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. रिषभला सामनावीर तर हार्दिकला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-