दुबईत मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२० चा अंतिम सामना जिंकला. यासोबत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले. यानंतर त्याला पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार मायकल वॉचाही समावेश आहे.
‘भारतीय टी२० संघ रोहितच्या नेतृत्त्वात करेल चांगली कामगिरी’
“मी विराट कोहलीवर टीका करत नाही. परंतु माझा असा विश्वास आहे की, रोहितच्या नेतृत्त्वात भारतीय टी२० संघ चांगली कामगिरी करेल. विराट एक महान व्यक्ती आहे. त्यामुळे जर त्याने एका क्रिकेट प्रकाराचे कर्णधारपद सोडले, तर तो वनडे आणि कसोटीत मोकळेपणाने खेळू शकेल,” असे क्रिकबझशी बोलताना वॉ म्हणाला.
“बाकी देशांमध्ये पाहिलं, तर इंग्लंडमध्ये जो रूट आणि ऑयन मॉर्गन, ऑस्ट्रेलियामध्ये टीम पेन आणि ऍरॉन फिंच हे वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारात संघाचे नेतृत्त्व करतात,” असेही वॉने इतर देशांच्या क्रिकेट संघांबद्दल सांगितले.
पुढे बोलताना तो म्हणाला, “हे खेळाडू प्रत्येक दिवशी इतके कठीण क्रिकेट खेळतात. त्यामुळे मला वाटते की, विराटसाठी हे चांगले असेल की त्याने टी२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडावे. जेणेकरून तो आपल्या खेळाचा आनंद घेईल आणि रोहितला नेतृत्त्व करू देईल.”
‘रोहित टी२० क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम कर्णधार’
“हे अपयशाचा स्विकार करणे नाही. हा भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वोत्तम निर्णय असेल. माझा विश्वास आहे की, पुढील वर्षी विश्वचषकात भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्त्वात खेळणे चांगले असेल. त्याला माहिती आहे की, मोठ्या स्पर्धा कशाप्रकारे जिंकायच्या असतात. रोहित भारतात टी२० क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम कर्णधार आहे,” असे रोहितच्या टी२० नेतृत्त्वाबद्दल बोलताना वॉ म्हणाला.
रोहितने आयपीएलमधील आपल्या मुंबई संघाला आयपीएलचे ५ वे विजेतेपद जिंकून दिले आहे. त्याचसोबत त्याने भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना ७ मोठ्या टी२० मालिका आणि स्पर्धांपैकी ६ मध्ये विजय मिळवला आहे.
हेही वाचा-
-रोहित शर्मा आयपीएलमध्ये ‘हा’ भीमपराक्रम करणारा एकमेव खेळाडू
-कोई शक ! विरेंद्र सेहवागने केले अनोख्या अंदाजात मुंबई इंडियन्सचे कौतुक
-पिछा ना छोडेंगे! चेन्नईनंतर ‘हा’ मोठा किर्तीमान मिळवणारा मुंबई दुसराच संघ
-मन जिंकलस भावा ! रोहितसाठी सूर्यकुमारने दिलेल्या बलिदानामुळे सोशल मीडियावर होतेयं जोरदार कौतुक