इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती. भारतीय संघ पहिली कसोटी जिंकण्याच्या जवळ आला होता. पण पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत अखेरच्या दिवशी संघाला विजय मिळाला. पण तिसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडने शानदार पुनरागमन केले आणि एका डावात विजय मिळवला. सध्या पाच सामन्यांची ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. चौथी कसोटी 2 सप्टेंबरपासून केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळली जाणार आहे. पण भारतीय संघाच्या दृष्टीने या मैदानावरील त्यांचा रेकॉर्ड खूपच वाईट आहे.
ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघ ठरलाय अपयशी
ओव्हल मैदानाबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने आतापर्यंत येथे 13 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील भारतीय संघाने फक्त एक सामना जिंकला आहे. तर संघाने 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 7 सामने अनिर्णित राहिले. मागील 50 वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर कसोटी जिंकू शकलेला नाही. या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या तीन कसोटींविषयी बोलायचं तर, भारतीय संघ तिन्ही कसोटीत पराभूत झाला आहे. त्यातील दोन कसोटींमध्ये तर संघाला एका डावाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
परंतु, 2018 मध्ये ओव्हल येथे खेळला गेलेला सामना केएल राहुल आणि रिषभ पंतसाठी संस्मरणीय राहिला आहे. इंग्लडमध्ये 2018 साली झालेल्या ओव्हल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने 332 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 292 धावांवर गारद झाला होता. रवींद्र जडेजाने नाबाद 86, हनुमा विहारी 56 आणि कर्णधार विराट कोहलीने 49 धावा केल्या होत्या. इंग्लंडने दुसरा डाव 8 बाद 423 धावांवर घोषित केला होता. अशाप्रकारे भारताला 464 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते.
प्रत्युत्तरात कोहली, पुजारा आणि विहारी यांना खातेही उघडता आले नव्हते. धवनने एक धाव केली होती. पण केएल राहुलने 149 आणि रिषभ पंतने 114 धावा करत धावफलक 345 धावांवर नेला होता. पण ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नव्हते. येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही संघाने असाच खेळ दाखवण्याची गरज आहे.
गेल्या ८५ वर्षांपासून मँचेस्टरवर भारतीय संघ पराभूत
भारतीय संघाला 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये शेवटची कसोटी खेळायची आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने येथील विक्रमही चांगला नाही. संघाने 1936 पासून आतापर्यंत म्हणजेच 85 वर्षांत येथे 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील एकाही सामन्यात भारतीय संघ जिंकलेला नाही. संघाने 4 सामने गमावले आहेत, तर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत. 2014 मध्ये खेळलेल्या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 54 धावांनी पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, बीसीसीआय अध्यक्षाचा अहवालही…
‘त्यांची रणनिती काहीही असो, आम्ही सामना करण्यास सज्ज’; इंग्लंडची भारताला बॅकफूटवर ढकलण्याची तयारी
एक तीर दो निशान! अजिंक्यच्या पदार्पणाची ‘दशकपूर्ती’, पत्नीने शुभेच्छा देत टीकाकारांवरही साधला निशाणा