एका महिन्यापूर्वी जे भारतीय पुरुष क्रिकेटपटू आयसीसीच्याच एका स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत पोचले होते आता तेच खेळाडू आणि करोडो इतर भारतीय, महिला क्रिकेटपटूंसाठी शुभेच्छुक बनले आहेत. हरमनप्रीत कौरचा प्रत्येक षटकार असो किंवा मिताली राजचा प्रत्येक विक्रम असो विराट कोहली, युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवाग या पुरुष भारतीय क्रिकेटपटूंकडून अश्या प्रत्येक कामगिरीरला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळत आहे. महिला क्रिकेटला भारतात एवढा प्रतिसाद मिळत आहे याचे मुख्य आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भारताने या विश्वचषकात केलेली उत्तुंग कामगिरी.
आतातर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघातील प्रत्येक खेळाडूला रुपये ५० लाख इतके बक्षीस ही जाहीर केले आहे. लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर भारतीय महिलांना इतिहास घडविण्याची सुवर्ण संधी आहे.
इंग्लडला भारताने महिला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पराभूत केले होते, त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे तर इंग्लंड तो सामना विसरून भारताला अंतिम सामन्याच्या दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करेल.
मागील ५ सामने:
इंग्लंड – विजय, विजय, विजय, विजय, विजय.
भारत – विजय, विजय, हार, हार, विजय.
महत्वाचे खेळाडू
भारत – स्मृति मंधाना
या भारतीय सलामीवर फलंदाजने भारतासाठी विश्वचषकाची सुरुवात गोड करून दिली होती. पहिल्या दोनी सामन्यात ९० आणि १०६ अशी धावसंख्या तिने केली होती. पण त्यानंतर सलग सहा सामन्यात तिला चांगला खेळ करता आलेला नाही. जर भारताला ती चांगली सुरुवात मिळवून देऊ शकली तर मधल्या फलित कौर आणि राज त्याचा चांगला फायदा उचलतील आणि मोठी धाव संख्या उभारतील.
इंग्लंड – फ्रन विल्सन
भारतीय संघाविरुध्द झालेल्या पहिल्या सामन्यात फ्रन विल्सनने ७५ चेंडू ८१ धावा करून दाखवून दिले आहे की ती जरी संघात स्थायी खेळाडू नसली तरी ती वेळ आल्यावर आपला उत्तम खेळ दाखवून देऊ शकते. उपांत्य फेरीत तिने दक्षिण आफ्रिके विरुद्ध केलेल्या ३० धाव ही खूप महत्वपूर्ण ठरल्या.
संभाव्य संघ
भारत – स्मृती मंधाना, पुनम राऊत, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, दिप्ती शर्मा, शिखा पांडे, सुषमा वर्मा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
इंग्लंड – लॉरेन विन्फिल्ड, टामी बेअमॉंट, हीथर नाइट (कर्णधार), सारा टेलर, नेटली सायव्हर, फ्रन विल्सन, कॅथरिन ब्रंट, जेनी गुन, लॉरा मार्श, अया श्राउबोल, अॅलेक्स हार्टले.
खेळपट्टीचे अनुमान
महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त म्हणजेच २६ हजारांपेक्षा ही जास्त प्रेक्षकांनी बघितला जाणारा हा सामना होणार आहे आणि टीव्ही सेटवर बघणारे तर काही दशलक्ष अधिक असतील. या खेळपट्टीवर खूप धावसंख्या होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाची शक्यता देखील आहे पण असे काही झाले तर त्यासाठी ही एक दिवस राखून ठेवला आहे.
कर्णधारांची मते
भारत – मिताली राज
“असे वाटत आहे की आम्ही २००५ मध्ये पुन्हा परतलो आहे आणि आम्ही खूश आहोत की आम्हला पुन्हा एकदा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळायला मिळत आहे. ”
इंग्लंड – हिथर नाईट
” आम्ही गेल्या 18 महिन्यांपासून जी काही मेहनत घेतली आहे त्यामुळेच आज आम्ही इथे आहोत .”