न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील कानपूर येथे झालेला पहिला सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ मुंबई येथे दुसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना खेळण्यासाठी उतरले आहेत. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड, या दोन्हीही संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. त्यामुळे तब्बल १३२ वर्षांपूर्वीच्या एका गोष्टीची या मालिकेत पुनरावृत्ती झाली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याचे पुनरागमन झाले आहे. यापूर्वी त्याला पहिल्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली होती.
तर दुसरीकडे मुंबई कसोटीत न्यूझीलंड संघाकडून त्यांचा नियमित कर्णधार केन विलियम्सन याला बाहेर ठेवले गेले आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान त्याच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. यामुळे तो संघाबाहेर आहे. म्हणून त्याच्याजागी उपकर्णधार टॉम लॅथम याला मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा संघनायक बनवण्यात आले आहे.
अशाप्रकारे २ सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि न्यूझीलंड संघाकडून ४ वेगवेगळे कर्णधार मैदानावर उतरले आहेत. याआधी १३२ वर्षांपूर्वी अर्थातच १८८९ मध्ये अशी अनोखी आणि दुर्मिळ बाब घडली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ओवन डनेल हे दक्षिण आफ्रिकाचे कर्णधार होते. तर इंग्लंडचे संघनायक ऑब्रे स्मिथ हे होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून विलियम मिल्टन हे कर्णधार म्हणून मैदानात उतरले होते. तर इंग्लंड संघाने ही जबाबदारी मॉन्टी बोडन यांच्यावर टाकली होती.
दरम्यान भारत आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिका अतिशय रोमांचक घडीवर आहे. पहिल्या सामन्यातील दोन्ही संघांच्या शानदार प्रदर्शानानंतर अखेर ही लढत निकाल न लागताच (अनिर्णित) संपली. त्यामुळे आता या मालिकेचा जय-पराजय हा दुसऱ्या, मुंबई कसोटीवर निर्भर असेल. हा सामना जिंकणारा संघ मालिकेवरही आपले नाव कोरले.
महत्त्वाच्या बातम्या-
“केकेआर माझं दुसरं घर”, रिटेन केल्यानंतर सुनील नरेन झाला इमोशनल