मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून (३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याचा शनिवारी (४ डिसेंबर) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात २१ षटकात बिनबाद ६९ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताची आघाडी ३३२ धावा झाली आहे.
न्यूझीलंडला पहिल्या डावात केवळ ६२ धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताकडून मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांची जोडी मैदानात उतरली. नियमित सलामीवीर शुबमन गिलला पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने तो फलंदाजीसाठी दुसऱ्या डावात सलामीला आला नाही. मयंक आणि पुजाराने सुरुवातीपासूनच चांगला खेळ करत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयंक ३८ धावांवर आणि पुजारा २९ धावांवर नाबाद परतले.
भारतीय गोलंदाजांनी उडवली न्यूझीलंडची दैना
भारताचा डाव ३२५ धावांवर संपवल्यावर न्यूझीलंड संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले. मोहम्मद सिराजने न्यूझीलंडचे पहिले तीन विकेट्स घेत पाहुण्यांना जबदरस्त धक्के दिले. त्याने चौथ्या षटकात विल यंग आणि टॉम लॅथम या सलामी जोडीला माघारी धाडले. यंगने ४ आणि लॅथमने १० धावा केल्या. त्यानंतर त्याने दिग्गज रॉस टेलरला ६ व्या षटकात १ धावेवर त्रिफळाचीत केले.
यानंतर मात्र, न्यूझीलंडचे फलंदाज एका मागोमाग एक बाद होत गेले. अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला ८ धावांवर ९ व्या षटकात पायचीत केले. त्यानंतर १४ व्या षटकात हेन्री निकोल्सला आर अश्विनने ७ धावांवर त्रिफळाचीत केले. जयंत यादवने १७ व्या रचिन रविंद्रला ४ धावांवर विराट कोहलीच्या हातून झेलबाद करत न्यूझीलंडला ६ वा धक्का दिला. इतकेच नाही, तर २० व्या षटकात आर अश्विनने न्यूझीलंडला २ धक्के दिले. त्याने या षटकात टॉम बंडेल आणि टीम साऊथीला बाद केले. बंडेल ८ धावांवर बाद झाला, तर साऊथी भोपळाही फोडू शकला नाही.
त्यानंतर काईल जेमिसन आणि विल्यम सोमवरविलने झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र २८ व्या षटकात २६ चेंडू खेळलेल्या सोमरविलला अश्विनने बाद केले. तसेच जेमिसनला अक्षर पटेलने २९ व्या षटकात श्रेयस अय्यरच्या हातून १७ धावांवर झेलबाद केले. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताकडे २६३ धावांची आघाडी मिळाली.
भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने ३ विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने २ आणि जयंत यादवने १ विकेट घेतली.
एजाज पटेलच्या १० विकेट्स
या सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताच्या पहिल्या डावातील सर्व १० विकेट्स घेतल्या आहेत. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आला.
पहिल्या सत्रात सुरुवातीच्या विकेट्सनंतर मयंक अगरवाल आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी भागीदारीसह डाव सावरत न्यूझीलंडला मोठे यश मिळू दिले नव्हते. पण, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच डावाच्या १०० व्या षटकात एजाज पटेलने पुन्हा भारताला मोठा धक्का दिला आणि मयंक अगरवालला माघारी धाडले. विकेट जाण्याच्या आधीच्याच चेंडूवर मयंकने चौकारासह आपले दीडशतक साजरे केले होते. पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने मयंकला १५० धावांवर बाद केले. मयंकने ही दीडशतकी खेळी करताना ३११ चेंडू खेळले, तर १७ चौकार आणि ४ षटकार मारले.
यानंतर अक्षर पटेलने चांगली खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. मात्र १०८ व्या षटकात एजाज पटेलने त्याला ५२ धावांवर बाद केले. यानंतर एजाज पटेलने ११० व्या षटकात जयंत यादवला १२ धावांवर आणि मोहम्मद सिराजला ४ धावांवर बाद करत १० विकेट्स पूर्ण केल्या. त्यामुळे भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आला.
एजाजने या डावातील भारताच्या सर्व १० विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो एजाज पटेल जिमी लेकर आणि अनिल कुंबळेनंतर एका कसोटी डावात १० विकेट्स घेणारा तिसराच गोलंदाज ठरला.
मयंक-अक्षरने सावरला डाव
दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावातील ७१ व्या षटकापासून आणि ४ बाद २२१ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद असलेली जोडी मयंक अगरवाल आणि वृद्धिमान सहा मैदानात उतरले. मयंकने १२० धावांपासून आणि सहाने २५ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.
मात्र, ही जोडी दुसऱ्या दिवशी फार काळ टिकू शकली नाही. कारण, मुंबई जन्मलेला पण न्यूझीलंडमध्ये लहानाचा मोठा झालेल्या एजाज पटेलने ७२ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर भारताला दुहेरी धक्के दिले. त्याने सहाला २७ धावांवर पायचीत केले, तर आर अश्विनला त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत करत माघारी धाडले.
भारताने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला झटपट विकेट गमावल्यानंतर मात्र, ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अक्षर पटेलने मयंक अगरवालची चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपेपर्यंत नाबाद ६१ धावांची भागीदारी केली. दरम्यान, मयंकने डावाच्या सुरुवातीपासून एक बाजू भक्कमपणे सांभाळली.
भारताने पहिल्या सत्राखेर पहिल्या डावात ९८ षटकात ६ बाद २८५ धावा केल्या. अगरवाल १४६ धावांवर आणि अक्षर पटेल ३२ धावांवर नाबाद आहेत.