भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेची उत्तम सुरूवात केली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिले तिन्ही सामने यजमान संघाने जिंकत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीमध्ये रविवारी (२५ जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात भारत ८ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर भारताने अनेक मोठे विक्रम मागे टाकले आहेत.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर अभिषेक शर्मा यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केल्या. भारताने १० षटकातच लक्ष्य पूर्ण केले. या विजयामुळे विक्रमांच्या यादीत वादळ आले आहे. या सामन्यात अभिषेक, सूर्यकुमारबरोबर भारताच्या नावावरही अनेक विक्रमे झाली आहेत. त्यातील काही प्रमुखे रेकॉर्ड्स पाहू,
भारताने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम केला आहे. यामुळे भारताने ६० चेंडू शिल्लक राखत विजय मिळवला. हा विजय सर्वाधिक चेंडू शिल्लक राखत आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात मोठा विजय ठरला.
या सामन्यात भारताने ३.१ षटकातच ५० धावसंख्या पूर्ण केली. तो पण एक विक्रम ठरला आहे. टी२०मध्ये एका संघाने सर्वात जलद ५० धावा करण्याचा विक्रम भारताने आपल्या नावे केला. तसेच भारताने ६.३ षटकातच १०० धावा पूर्ण केल्या होत्या. यामुळे भारताने सांघिकरित्या सर्वात जलद १०० धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.
अभिषेकने या सामन्यात १४ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. हे भारताकडून टी२० मधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याच्यापुढे केवळ युवराज सिंग आहे. त्याने २००७मध्ये १२ चेंडूतच ५० धावा पूर्ण केल्या होत्या.
भारताने न्यूझीलंड विरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय (१० षटकाच्या आत) मिळवला. न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाने १० षटकाच्या आत लक्ष्य गाठले नव्हते. त्यामुळे भारत पहिलाच संघ ठरला आहे.
या सामन्यात भारताचा रनरेट १५.५ राहिला. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना १५ रनरेट असणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे. त्याचबरोबर भारताने घरच्या मैदानावर लागोपाठ सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रमही केला. भारताने लागोपाठ १० मालिका जिंकल्या आहेत. भारताचा हा प्रवास २०२२पासून सुरू आहे. तसेच घरच्या मैदानावर लागोपाठ सर्वाधिक टी२० मालिका जिंकण्याचाही विक्रम भारतानेच केला. २०२४पासून भारताने आतापर्यंत ११ टी२० मालिका जिंकल्या आहेत.






