भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका भारतीय चाहत्यांच्या कायमच लक्षात राहिल. तीन सामन्यांची ही मालिका यजमान भारताने १-२ने गमावली आणि न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. या मालिकेमध्ये भारताकडून अनेक चुका झाल्या आहेत. पहिल्या सामन्यापासून स्टार फलंदाज विराट कोहली याच्या बॅटमधून धावा निघत होत्या, मात्र रोहित शर्माच्या फलंदाजीची चमक गायब झालेली दिसली, यामुळे तो या प्रकारातूनही निवृत्ती घेतो का अशा चर्चा सुरू झाल्या.
रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीन सामन्यात अवघ्या २०.३३च्या सरासरीने एकूण ६१ धावा केल्या आहेत. यातील त्याची सर्वोत्कृष्ठ धावसंख्या २६ राहिली. या मालिकेआधी तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकांमध्ये मोठ्या खेळी करत संघाला विजय मिळवून दिले होते. त्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शतक आणि एक अर्धशतक, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन अर्धशतके केली होती.
न्यूझीलंड विरुद्ध रोहितचा फॉर्म हरवल्याचे दिसले. तसेच तो २०२१नंतर पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत एक अर्धशतकही करण्यात अपयशी ठरला आहे. कसोटी आणि टी२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो सध्या भारताकडून केवळ वनडे सामने खेळताना दिसतो. ” जेव्हा आपण एकच प्रकार खेळतो तेव्हा आपला सराव कमी होतो. रोहितमधील धावांची भूक कमी होताना दिसत आहे “, असे न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल यांनी म्हटले.
अशातच रोहित घरच्याच मैदानावर फलंदाजी करताना अडखळत असेल तर २०२७मध्ये खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेत त्याच्या जागेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या २०२७च्या विश्वचषकापर्यंत रोहित ४० वर्षाचा होईल. वयाच्या ४० पर्यंत खूपच कमी खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसले आहेत. रोहितही तशी कमगिरी करू शकतो, मात्र त्याचा सराव खूपच कमी होईल. तसेच बाकी खेळाडू आगामी टी२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असून रोहित रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्येच खेळताना दिसेल.





