---Advertisement---

‘जेव्हा- जेव्हा लोक म्हणतील की, त्याच्यात आता दम नाही…’, सलमान खानकडून ‘माही’चे कौतुक

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 8:20 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ चा महत्त्वाचा आणि अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे बलाढ्य संघ आमने- सामने होते. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, हा सामना सीएसकेने २७ धावांनी जिंकला आणि चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपदक पटकावले. दुसरीकडे अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलच्या स्पेशल शोमध्ये पोहोचलेल्या बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने एमएस धोनीबद्दलचे मत व्यक्त केले होते. यावरून समजते की, तो धोनीचा किती मोठा चाहता आहे.

खरं तर, आपल्या ‘अंतिम’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेला सलमान खान निवेदक जतीन सप्रू आणि इरफान पठाणशी चर्चा करत होता.

सलमान खानने गायले एमएस धोनीचे गुणगान
या शोमध्ये विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना सलमान म्हणाला होता की, जे लोक म्हणायचे की, धोनीमध्ये आता दम राहिला नाही, त्या सर्वांना माहीने चुकीचे ठरवले. तो म्हणाला होता की, “मागील वर्षी, जेव्हा चेन्नई संघ सर्वप्रथम पहिल्यांदा आयपीएलमधून बाहेर पडला होता, तेव्हा काही लोकांनी धोनीचे करिअर संपवले होते. ते म्हणत होते की, त्याच्यात आता दम राहिला नाही. आज पाहा माही फायनलमध्ये पोहोचला आहे. जेव्हा- जेव्हा लोक म्हणतील की, त्याच्यात आता दम राहिला नाही, तेव्हा- तेव्हा तो तुम्हाला चुकीचे सिद्ध करेल.”

सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात केकेआरचा कर्णधार ऑयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेकडून डू प्लेसिसने शानदार ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज गायकवाड (३२), रॉबिन उथप्पा (३१) आणि मोईन अली (३७*) यांची चांगली साथ लाभली. त्यामुळे सीएसकेने २० षटकांत १९२ धावांची मोठी मजल मारली होती.

त्यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या केकेआरला १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या. केकेआरकडून केवळ शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने अर्धशतके करत झुंज दिली. मात्र, अन्य कोणतेच फलंदाज फार काही करू शकले नाही. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने उत्तम गोलंदाजी करताना ३८ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. त्यामुळे चेन्नईने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

धोनीचे ‘त्रिशतक’
एमएस धोनीने टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ३०० सामने खेळणारा जगातील पहिलाच खेळाडू बनला आहे. त्याने आयपीएल २०२१ मधील अंतिम सामन्यात केकेआरविरुद्ध मैदानावर उतरताच हा कारनामा आपल्या नावावर केला होता.

संबंधित बातम्या-

-प्रतिस्पर्धी असूनही ‘त्या’ प्रसंगानंतर धोनीने त्रिपाठीची थोपटली पाठ, कारण ऐकून छाती अभिमानाने फुगेल

-चेन्नईच्या प्रशिक्षकाचा मुंबईच्या प्रशिक्षकाला धोबीपछाड; फ्लेमिंगच्या नावे नवा आयपीएल विक्रम

-जिथे जाऊ, तिथे आमचाच बोलबाला! आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे ५ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---