मुंबई। शनिवारी (१६ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात बेंगलोरने १६ धावांनी विजय मिळवला. या विजयात यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. यानंतर कार्तिकने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर कार्तिक (Dinesh Karthik) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सुरुवातीच्या सामन्यासाठी दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने दिल्ली विरुद्ध (RCB vs DC) देखील अर्धशतकी खेळी करताना ३४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी केली. तसेच त्याने ही खेळी करताना शाहबाज अहमदबरोबर नाबाद ९७ धावांची भागीदारीही केली. त्याच्या या खेळीचे सध्या खूप कौतुक होत आहे.
सध्या दमदार फॉर्ममध्ये असलेला ३६ वर्षीय दिनेश कार्तिक सामन्यानंतर म्हणाला, ‘नक्कीच हे मान्य करावे लागेल की माझ्यासमोर मोठी ध्येय आहेत. मी खूप मेहनत करत आहे. मी भारतीय संघाचा भाग होण्यासाठी शक्य होईल, ते सर्व प्रयत्न करत आहे.’
तसेच तो त्याच्या खेळीबद्दल बोलताना म्हणाला, ‘कोणता गोलंदाज गोलंदाजी करत आहे, यावर बरेच निर्भर असते. मी कुलदीपला सन्मान दिला, कारण तो खरंच चांगली गोलंदाजी करत होता.’ तसेच त्याच्या शांत स्वभावाबद्दल विचारले असता, तो म्हणाला, ‘मला वाटते तुमचे स्थान आणि शांतपणा तुम्ही तुमच्या तयारीतून येत असते. तसेच वर्तमानाचाच विचार करणे, मदतशीर ठरते.’
शाहबाजबरोबर केलेल्या भागीदारीबद्दल कार्तिक म्हणाला, ‘शाहबाज खूप खास खेळाडू आहे. मला खात्री आहे, तो पुढेही विशेष कामगिरी करेल. तो मोठे फटके मारू शकतो. तो स्वत:ला पाठिंबाही देतो.’
शाहबाजने २१ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. त्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलनेही बेंगलोरकडून अर्धशतकी खेळी करताना ५५ धावा केल्या होत्या. त्यामुळे बेंगलोरला प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८९ धावा करता आल्या. सामन्यानंतर बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही कार्तिक, मॅक्सवेल आणि शाहबाजचे कौतुक केले. या सामन्यात १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकांत ७ बाद १७३ धावाच करता आल्या.
भारतीय संघातील निवडीसाठी कार्तिकने ठोकली दावेदारी
दिनेश कार्तिकने आत्तापर्यंत आयपीएल २०२२मध्ये ६ सामन्यांत १९७ च्या सरासरीने आणि जवळपास २०९ च्या स्ट्राईकरेटने १९७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत नाबाद राहिला आहे. त्याने या सहा सामन्यांत अनुक्रमे नाबाद ३२ धावा (१४ चेंडू), नाबाद १४ धावा (७ चेंडू), नाबाद ४४ धावा (२३ चेंडू), नाबाद ७ धावा (२ चेंडू), ३४ धावा (१४ चेंडू), नाबाद ६६ धावा (३४ चेंडू) अशा धावसंख्या उभारली आहे.
त्याने केलेल्या या शानदार कामगिरीमुळे त्याच्याकडे आता एक चांगला फिनिशर म्हणून पाहिले जात आहे. तसेच यावर्षी भारतीय संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक खेळायचा आहे. त्यादृष्टीने आधी काही महत्त्वाच्या मालिकाही होतील. अशात आता कार्तिकने भारतीय संघात (Team India) स्थान मिळवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| पंजाब वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
…म्हणून तब्बल ८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला साध्या ८० विकेट्सही घेता आल्या नसत्या!
ये भी देखो जरा! स्टॉयनिसने भिरकावला तब्बल १०४ मीटरचा खणखणीत षटकार; नंतर दिली ‘अशी’ रिऍक्शन