गुजरात टायटन्स आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. मंगळवारी (२४ मे) गुजरातने क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सला मात दिली आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. डेविड मिलर याने गुजरातला विजय मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले आणि यासाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मिलरने खास प्रतिक्रिया दिली.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सच्या नुकसानावर १८८ धावा केल्या. हे लक्ष्य गुजरात टायटन्सने ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.३ षटकात गाठले. विजय मिळवून देण्यासाठी डेविड मिलरने शेवटच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाला सलग तीन षटकार मारले आणि तीन चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला. कर्णधार हार्दिकने देखील चांगली फलंदाजी केली.
“ऑफ साईडवरील माझ्या खेळीविषयी टीका केली जायची, त्यामुळे मी ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन त्याच दिशेला षटकार मारण्याचा प्रयत्न केला. आयपीएलमध्ये तुम्ही नवीन संघांसोबत खेळता आणि तुम्हाला नवीन खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. पहिल्या विजयानंतर आमच्यासाठी सर्वकाही ठीक होत गेले. तुम्ही जे करू शकता, त्याला नियंत्रित केले पाहिजे. खूप पुढचा विचार करायचा नाही. डावाचा शेवट करताना जास्त विचार न करता चेंडूवर प्रहार करायचा. तुम्हाला फक्त संधीचा फायदा घ्यायचा असतो,” असेही मिलर म्हणाला.
गुजरात टायटन्सने राजस्थानला मात दिल्यानंतर आता त्यांना थेट अंतिम सामन्यात खेळायचे आहे, जो २९ मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. याविषयी बोलताना मिलर म्हणाला की, “आता चार दिवस आराम करण्यासाठी मिळतील. आता बसचा प्रवास करून होटेलवर जायचे आणि विजयाचा जल्लोष करायचा आहे.”
दरम्यान, मिलरने या क्वालिफायर सामन्यात केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर विजयामध्ये त्याची भूमिका सर्वात महत्वाची ठरली. त्याने ३८ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद ६८ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ५ षटकारांचा, तर ३ चौकारांचा समावेश होता. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने ३५ चेंडू घेतले.