इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे (IPL 2022) बिगूल वाजले आहेत. काही दिवसांपूर्वीच या हंगामाचा लिलाव पार पडला होता. आता या हंगामाच्या महत्त्वाच्या तारखा आणि स्वरुपाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) बीसीसीआयकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली आहे. गुरूवारी (२४ फेब्रुवारी) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक (IPL Governing Council meeting) पार पडली होती. या बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आयपीएल २०२२ च्या तारखा घोषित
आयपीएलचा २०२२ या वर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यातील ७० सामने साखळी फेरीत होतील, तर ४ सामने प्लेऑफचे असतील (IPL 2022 Start date and Final Date).
महाराष्ट्रात होणार साखळी फेरी
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने घेतलेल्या निर्णयानुसार आयपीएल २०२२ मधील साखळी फेरीचे सर्व ७० सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येणार आहेत. यामागे कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जास्तीचा विमानप्रवास टाळणे हे मुख्य कारण आहे. गेल्या दोन हंगामात कोविड-१९ चा मोठा फटका या स्पर्धेला बसला आहे. त्यामुळे यंदा हा धोका टाळण्यासाठी साखळी फेरीतील सर्व सामने मुंबई आणि पुणे या दोनच शहरात खेळवले जाणार आहेत.
साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत खेळवले जातील. हे ५५ सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील अशा तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जातील. त्याचबरोबर साखळी फेरीचे १५ सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर खेळवले जातील. तसेच प्लेऑफच्या ४ सामन्यांसाठी अद्याप ठिकाण ठरवण्यात आलेले नाही.
सर्व संघ साखळी फेरीतील प्रत्येकी ४ सामने वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळतील, तर प्रत्येकी ३ सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि गहुंजे येथे खेळतील (IPL 2022 kickstart from 26th March, 2022 and league games to be played in Mumbai and Pune).
असे असेल साखळी फेरीचे स्वरुप
यंदाच्या आयपीएल हंगामापासून आठ जुन्या संघांसह गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे साखळी फेरीतील सामन्यांची संख्या वाढली आहे. साखळी फेरीत एकूण ७० सामने होणार आहेत. तसेच यंदा आयपीएलचे स्वरुपही बदलणार आहे.
आयपीएल २०२२ मध्ये १० संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. तसेच प्रत्येक संघ साखळी फेरीत १४ सामने खेळणार आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. तसेच दुसऱ्या गटातील एका संघाविरुद्ध दोन सामने आणि अन्य चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल, तर चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामने खेळेल.
तसेच कोणते संघ कोणाविरुद्ध २ सामने खेळणार आहे, हे ठरवण्यासाठी संघांनी जिंकलेल्या आयपीएल विजेतेपदांचा आणि संघांनी खेळलेल्या अंतिम सामन्यांचा विचार करण्यात आलेला आहे. या क्रमवारीतील सम आणि विषम संख्यांनुसार गट पाडण्यात आले आहेत.
सर्वाधिकवेळा आयपीएल विजेतेपदे जिंकणारे आणि अंतिम सामना खेळणारे संघ
५ विजेतेपदे – मुंबई इंडियन्स (६ अंतिम सामने)
४ विजेतेपदे – चेन्नई सुपर किंग्स (९ अंतिम सामने)
२ विजेतेपदे – कोलकाता नाईट रायडर्स (३ अंतिम सामने)
१ विजेतेपदे – सनरायझर्स हैदराबाद (२ अंतिम सामने)
१ विजेतेपदे – राजस्थान रॉयल्स (१ अंतिम सामने)
० विजेतेपदे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (३ अंतिम सामने)
० विजेतेपदे – दिल्ली कॅपिटल्स (१ अंतिम सामने)
० विजेतेपदे – पंजाब किंग्स (१ अंतिम सामने)
० विजेतेपदे – लखनऊ सुपर जायंट्स (०अंतिम सामने)
० विजेतेपदे – गुजरात टायटन्स (० अंतिम सामने)
आयपीएल २०२२ हंगामातील साखळी सामन्यांसाठी संघांची गटवारी –
गट अ
१. मुंबई इंडियन्स (MI)
२. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
३. राजस्थान रॉयल्स (RR)
४. दिल्ली कॅपिटल्स (DC)
५. लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
गट ब
१. चेन्नई सुपर किंग्स (CSK)
२. सनरायझर्स हैदराबाद (SRH)
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)
४. पंजाब किंग्स (PBKS)
५. गुजरात टायटन्स (GT)
पाहा कोणते संघ कोणाविरुद्ध खेळणार २ सामने
आयपीएल २०२२ साठी २०४ खेळाडूंवर लागली बोली
बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएल २०२२ हंगामासाठीच्या लिलावात २०४ खेळाडूंवर बोली लागली आहे. तसेच त्याआधी एकूण १० संघांनी मिळून ३३ खेळाडूंना संघात कायम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ राज्यात सुरू होतेय देशातील पहिलीच महिला क्रिकेट अकादमी, विनाशुल्क पुरवल्या जातील सुविधा