क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्त्व असते. आयपीएल मेगा लिलिवाच्या (IPL mega auction) ठीक आधी भारताच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक जिंकून आगामी कारकिर्दीसाठी एक योग्य पाऊल टाकले होते. पण तरीही आयपीएलच्या मेगा लिलावात त्यांच्यावर अपेक्षित बोली लागताना दिसली नाही. यूवा संघातील काही खेळाडू वगळता इतरांची निराशा झाल्याचे दिसते. लिलावात युवा संघातील खेळाडूंवर बोली लावताना फ्रँचायझींकडून सतर्कता बाळगली गेली.
१९ वर्षाखालील विश्वचषकात भारताचा कर्णधार यश धूल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला होता. विश्वचषक जिंकण्यासाठी धूलचे योगदान बहुमूल्य राहिले. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. तसेच युवा संघाचा अष्टपैलू राज बावा याला पंजाब किंग्जने तब्बल २ कोटी रुपये खर्च करून संघात सामील केले. त्याव्यतिरिक्त अष्टपैलू राजवर्थन हंगार्गेकरला चेन्नई सुपर किंग्जने ३० लाख रुपयांमध्ये, तर विक्की ओत्सवालला दिल्ली कॅपिटल्सने २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.
यश धूल यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सद्वारे संचालित क्रिकेट अकादमीत सराव केला आहे आणि आता त्याच संघासाठी त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. राजवर्धन हंगार्गेकरला त्याच्या उत्कृष्ट यॉर्कर चेंडूसाठी ओळखले जाते आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना त्याला एमएस धोनीचे मार्गदर्शन मिळणार आहे. धोनीकडून त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळू शकतात. विश्वचषकातील त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर राज बावा १९ वर्षाखालील भारतीय संघामधील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
त्याव्यतिरिक्त दक्षिण अफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघाचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविस या सर्व भारतीय खेळाडूंवर भारी पडला आहे. मुंबई इंडियन्सने ब्रेविससाठी तब्बल तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. ब्रेविसला दक्षिण अफ्रिका संघाचा भविष्यातील मोठा खेळाडू मानले जात आहे. त्याची एबी डिविलियर्सबरोबर देखील तुलना केली जाते.
दरम्यान, मागच्या काही वर्षांमध्ये पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्यासरख्या खेळाडूंना १९ वर्षाखालील विश्वचषकानंतर तत्काळ आयपीएल फ्रँचायझींकडून मोठी रक्कम मिळाली होती. परंतु, यावर्षी मात्र फ्रँचायझींकडून युवा खेळाडूंवर खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घेतले गेले आहेत. गिल आणि शॉ दोघे आता भारताच्या मुख्य संघासाठीही काही महत्वाच्या सामन्यांमध्ये खेळले आहेत.
शॉ आणि गिल यांच्याव्यतिरिक्त शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पोरेल आणि रियान पराग असे १९ वर्षांखालील भारतीय संघातून पुढे आलेले हे खेळाडू देखील चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात दिसतात. परंतु, त्यांना नियमितपणे असे प्रदर्शन करता आले नाही.
मागच्या वेळी १९ वर्षाखालील खेळाडू पूर्णपणे तयार असल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या बोल्या लागल्या होत्या. त्यावेळी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटचाही बराच अनुभव होता. परंतु, सध्याच्या युवा संघाचा विचार केला, तर खेळाडूंना अजून पुरेसा अनुभव नसल्याने ते तयार झाल्याचे दिसत नाही, त्यामुळेच त्यांच्यावर मोठी बोली लागताना दिसली नाही. सध्याच्या १९ वर्षांखालील भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी राज्याच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पणही केलेले नाही.
महत्वाच्या बातम्या –
कोहलीच्या ‘विराट’ खेळीची प्रतिक्षा वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत संपणार! ‘हे’ आहे मोठे कारण
अखेर जोडी तुटली! अनेकवर्ष एकत्र खेळल्यानंतर आयपीएल २०२२ मध्ये ४ लोकप्रिय जोड्या झाल्या वेगळ्या