आयपीएल 2026 स्पर्धेचा (IPL 2026) अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली आरसीबी सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे, तर शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली गुजरात संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळणार आहे. या निमित्ताने दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीवर नजर टाकूया.
रजत पाटीदारने (Rajat Patidar) कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात आरसीबीला चॅम्पियन बनवले होते. त्याने आतापर्यंत 27 सामन्यांत नेतृत्व केलं असून, त्यापैकी 19 सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याचा विजयाचा दर (Win Percentage) 70% च्या आसपास आहे.
आरसीबीची धुरा सांभाळण्यापूर्वी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्यप्रदेश संघाला फायनलपर्यंत नेले होते. चालू हंगामात फलंदाज म्हणून त्याने 14 सामन्यांत 196.76 च्या स्ट्राईक रेटने 486 धावा केल्या आहेत.
शुबमन गिलने (Shubman gill) आतापर्यंत 43 सामन्यांत गुजरातचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 24 सामन्यांत विजय आणि 18 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्याचा विजयाचा दर 57.14% आहे. कर्णधार म्हणून आकडेवारी पाहिली तर रजत पाटीदारचे पारडे जड दिसते. या हंगामात गिलने 15 सामन्यांत नेतृत्वाची धुरा सांभाळली असून, 10 विजय आणि 5 पराभव अशी कामगिरी केली आहे. फलंदाज म्हणून त्याने 15 सामन्यांत 163.71 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 722 धावा ठोकल्या आहेत.
आरसीबी आणि गुजरात (RCB vs GT) या दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. बेंगळुरूने गेल्या वर्षी पंजाब किंग्सला हरवून जेतेपद पटकावले होते, तर गुजरातने 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद मिळवले होते. आरसीबीसाठी हा पाचवा, तर गुजरातसाठी तिसरा आयपीएल फायनल सामना आहे. आता 31 मे रोजी कोण बाजी मारते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






