आयपीएलचा (Indian premiere league) नवा हंगाम सुरू होणार आहे. यावेळी या स्पर्धेचा 19 वा हंगाम खेळवला जाणार असून, 28 मार्चपासून याचा श्रीगणेशा होईल. दरम्यान, सर्व संघांची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि सर्व संघांच्या कर्णधारांची घोषणाही आधीच करण्यात आली आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने (Axar Patel) इंडियन प्रीमियर लीगपूर्वी आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. विशेषतः त्याने ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाबद्दल भाष्य केले आहे, जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अक्षर पटेलचे म्हणणे आहे की, त्याला हा नियम अजिबात आवडलेला नाही आणि त्याने त्यामागचे कारणही सांगितले आहे. या हंगामामध्येही अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सांभाळताना दिसेल. गेल्या वर्षीही तोच कर्णधार होता, पण संघाची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. अक्षर पटेलच्या मते, इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंसाठी संधी खूप कमी होतात. त्याने हे देखील स्पष्ट केले की, गेल्या वर्षी त्याने कमी गोलंदाजी केली होती, त्यामागे आयपीएलचा हा नियम कारणीभूत नव्हता.
अक्षर पटेलने हसत हसत स्पष्टपणे सांगितले की, तो स्वतः एक अष्टपैलू आहे आणि म्हणूनच त्याला हा नियम आवडत नाही. तो म्हणाला की, जेव्हा हा नियम लागू नव्हता, तेव्हा मॅचपूर्वी अष्टपैलू खेळाडूंना जास्त महत्त्व दिले जायचे. पण जेव्हापासून हा नियम आला आहे, तेव्हापासून अष्टपैलू खेळाडूची भूमिका मर्यादित झाली आहे. संघांना माहित असते की ते नंतर कोणत्याही एका खेळाडूला बदलून दुसऱ्याला संघात घेऊ शकतात. मात्र, जे नियम ठरवून दिले आहेत, ते मानावेच लागतात आणि त्यानुसार खेळावे लागते, असेही त्याने नमूद केले.
अक्षर पटेलसाठी आयपीएलचा गेला हंगाम फारसा चांगला राहिला नाही. तो संघाचा कर्णधार होता, पण संघ ‘टॉप फोर’मध्ये जागा मिळवू शकला नव्हता. अक्षरने स्वतः पूर्ण हंगामामध्ये केवळ 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने कमी गोलंदाजी का केली, असे विचारल्यावर त्याने सांगितले की यामागे त्याची दुखापत होती.
त्याने खुलासा केला की, गेल्या आयपीएलपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना ती जखम अधिक खोलवर गेली आणि यामुळेच तो कमी गोलंदाजी करत होता.






