आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार, २३ मे) एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज भिडणार आहेत. लखनऊ आधीच स्पर्धेबाहेर झाले आहेत, मात्र पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी हा सामना जिंकला तरी ते लगेच प्लेऑफमध्ये दाखल होणार नाही. त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागले, इतर सामन्यांच्या निकालाची.
आयपीएल २०२६ च्या पहिल्या सात सामन्यांमध्ये अपराजित राहणारा पंजाब आता सलग सहा सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. ते सध्या गुणतालिकेत १३ गुणांसह पाचव्या स्थानी आहेत. आज (२३ मे) लखनऊ विरुद्धचा सामना जिंकला तर त्यांचे १५ गुण होतील आणि ते पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवतील, मात्र त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित नाही. यामागचे कारण असे की, एक संघ १६ गुणांपर्यंत आणि दुसरा संघ १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे पंजाबला लीग फेरीच्या अंतिम सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
तसेच पंजाबने हा सामना गमावला, तर ते थेट स्पर्धेबाहेर जातील. त्यामुळे त्यांना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (२४ मे) या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. हा सामना मुंबईने जिंकला तर पंजाबचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल. तसेच त्यांना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याच्या निकालाचीही वाट पाहावी लागणार आहे.
कोलकाताचे सध्या १३ पॉइंट्स आहेत, त्यांनी दिल्लीला पराभूत केले तर त्यांचेही १५ पॉइंट्स होतील. अशात नेट रनरेटची भुमिका महत्त्वाची ठरेल. या परिस्थितीत कोलकातालाही प्लेऑफचे तिकीट मिळू शकते. राजस्थानने मुंबईला पराभूत केले तर पंजाबबरोबर कोलकाता आणि दिल्ली हे पण प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडतील.
सध्यातरी पंजाबचा नेट रनरेट कोलकातापेक्षा अधिक आहे, मात्र एक विजय मोठा फरक निर्माण करेल. पंजाबला मोठा विजय मिळाला, तर त्यांना अधिक फायदा आहे.





