दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्ली विरुद्ध किंग्ज ११ पंजाब सामन्याबद्दल बोलताना आपण दबावात येत नसल्याचे वक्तव्य केले आहे. असे सामने खेळायची सवय झाल्याचेही तो म्हटला आहे. काल दिल्ली विरुद्ध पंजाब सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.
या सामन्याविषयी बोलताना अय्यर म्हणाला, “सामन्यात अशा प्रकारचा चढ-उतार पाहणे कठीण होते. परंतु आमच्या संघाला सवय आहे. अगदी मागील हंगामातही आम्ही अशा परिस्थितींचा सामना केला होता.”
कालच्या दिल्लीच्या विजयाचे नायक मार्कस स्टोयनिस आणि कगिसो रबाडा ठरले. रबाडाने सुपर ओव्हरमध्ये केवळ दोन धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या.
संघाच्या खराब क्षेत्रऱक्षणाविषयी बोलताना तो म्हणाला, “रबाडा सामना विजेता खेळाडू आहे. तर ज्याप्रकारे स्टोयनिसने अंतिम षटकात फलंदाजी केली, त्यामुळे सामन्याचं चित्रच पालटलं. डोळ्यावर प्रकाश पडत असल्यामुळे झेल घेणे कठीण होते पण हे असलं कारण चालणार नाही. आम्हाला हे सुधारायलाच पाहिजे.”
“स्टोयनिसनेही गोलंदाजीची जबाबदारी चांगली पार पाडली आणि अखेरच्या दोन चेंडूंत दोन विकेट्स घेऊन सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरकडे वळला. अश्विन फक्त एक षटक टाकू शकला, ज्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर तो दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर गेला. पण तो पुढच्या सामन्यात खेळू शकेल.” आश्विनच्या दुखापतीबद्दल बोलताना अय्यरने स्पष्ट केले.
“अश्विन म्हणाला पुढच्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त असेल पण शेवटी निर्णय फिजिओला घ्यायचा आहे. दुखापतीनंतर मधल्या षटकांत अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी केली,” असेही तो पुढे म्हणाला.
तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलनी मयंक अग्रवालचे जोरदार कौतुक केले. तसेच संघाने केलेल्या चुकाही राहुलने मान्य केल्या. राहुल म्हणाला, “हा आमचा पहिला सामना होता आणि आम्ही त्यातून बरेच काही शिकलो. मयांकने एक अविश्वसनीय डाव खेळला आणि सामना इतका जवळ आणला. तो कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि सामना इतक्या जवळ आणल्याने संघाचा आणि त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.”
“निकाल काहीही असो, कर्णधार म्हणून मी त्याची जबाबदारी घेतो. आम्ही आमच्या रणनितीवर कायम आहे. पण आम्ही काही चुकाही केल्या. ५ विकेट्सवर ५५ धावा असतानाही आम्ही सकारात्मक होतो,” असेही तो पुढे म्हणाला.