भारताचा युवा प्रतिभावान फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमध्ये यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. जेव्हा विरोधी संघांच्या धावा रोखण्याची गरज असते, तेव्हा आरसीबीचा कर्णधार विराट कोहली वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी देतो आणि त्यात त्याला काही प्रसंगी यशही मिळाले आहे. मोठमोठे फलंदाजही त्याची गोलंदाजी सहजपणे खेळू शकले नाहीत. सुंदरने त्याला मिळालेल्या यशाचे रहस्य सांगितले आहे.
…..तर कोणता चेंडू फेकायचा हे कळते
वॉशिंग्टन सुंदर म्हणाला की, “फलंदाजाच्या पायाकडे लक्ष दिल्यास तो कोणता फटका खेळणार याचा अंदाज लागतो. त्यामुळे हातातून उशीरा चेंडू सोडल्यास यश मिळते. जर फलंदाज काय करणार याची माहिती असेल तर आपल्याला कोणता चेंडू फेकायचा आहे हे कळते.”
इकॉनॉमी दर पाच पेक्षाही आहे कमी
वॉशिंग्टन हा उंच खेळाडू आहे. त्यामुळे त्याने फेकलेला चेंडू खेळण्यास फलंदाजाला कठीण जाते. त्यासाठी त्याने आपल्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे.
आयपीएलमध्ये या हंगामात खेळताना वॉशिंग्टन जास्त बळी घेऊ शकला नाही, परंतु त्याने अचूक लाईन आणि लेंग्थवर गोलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांत फक्त 5 बळी घेतले आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्याचा इकॉनॉमी दर 5 पेक्षा कमी आहे.प्रत्येक सामन्यात धावा रोखण्यात त्याला यश आले आहे. जेव्हा धावा रोखण्याची गरज असते तेव्हा तो गोलंदाजी करायला येतो. आरसीबीला मिळालेल्या यशामध्ये त्याचा महत्वाचा वाटा आहे.
आरसीबीच्या विजयात आहे मोलाचा वाटा
या हंगामात आरसीबीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबईसारख्या बलाढ्य संघालाही आरसीबीने पराभूत केले आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी या संघाने पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळेच गुणतालिकेत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविण्यात संघ यशस्वी ठरला आहे. फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि साऊथ आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स चांगली कामगिरी करत आहेत. संघात प्रत्येक खेळाडूची स्वतःची वेगळी भूमिका असते.