भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर, तर एक संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. रविवारी (२६ जून) द विलेज, मालाहिदे, डबलिन येथे झालेल्या आयर्लंड विरुद्ध भारत या पहिल्या टी२० सामन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच भारताला या दौऱ्यातही दुखापतग्रस्त खेळाडूंचा फटका बसला आहे. या दोन्ही दौऱ्यात भारतीय संघाच्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघव्यवस्थापक चिंतेत आले आहे. आयर्लंडच्या दौऱ्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाली आहे.
आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज क्षेत्ररक्षणासाठी आला होता. मात्र फलंदाजीवेळी तो नाही तर दीपक हुड्डा (Deepak Hooda) हा इशान किशन (Ishan Kishan) सोबत सलामीला आला. चाहत्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. हार्दिकने या पाठीमागचे कारण स्पष्ट केले आहे.
“ऋतुराजच्या पायाला दुखापत झाली असल्याने त्याच्याबाबतीत आम्ही थोडी जोखीम घेऊन त्याला फलंदाजीसाठी पाठवणार होतो, मात्र मला संघसहकाऱ्यांची अधिक काळजी आहे. या सामन्यासाठी फलंदाजीचा क्रम निश्चित केला होता. त्यामध्ये फक्त वरच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आला. ऋतुराजबाबत आम्हाला कोणतीही हलगर्जी घ्यायाची नाही,” असे हार्दिकने म्हटले आहे.
“हुड्डाच्या कामगिरीवर मी खूप खूश आहे. त्याला शेवटच्या मिनीटाला सलामीला येण्याबाबत सांगितले होते. अशा वेळी त्याने सलामीला येत सामनाविजयी खेळी केल्याने तुम्ही संघासाठी एक उदाहरण तयार करत आहात,” अशा शब्दांत हार्दिकने दीपक हुड्डाच्या खेळीचे कौतुक केले आहे. दीपकने या सामन्यात २९ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ चौकार आणि २ षटकार फटकारत १६२.०७च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.
पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. यामुळे हा सामना २० वरून १२ षटकांचा करण्यात आला. हार्दिकने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत आयर्लंड संघाला १२ षटकांमध्ये १०८ धावांवरच रोखले. नंतर फलंदाजांनी उत्तम खेळी करत आयर्लंड विरुद्ध सलग चौथा टी२० सामना जिंकण्याची कामगिरी केली आहे.
ऋतुराज दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. इंग्लंडमध्येही कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्या जागी मयांक अग्रवाल याला भारतीय संघाचे बोलावणे आले आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी२० सामना २८ जूनला डबलिन येथे खेळला जाणार आहे
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार पंड्याचं व्हिजन आयपीएल २०२३, भारत-आयर्लंड टी२०तून गुजरात टायटन्ससाठी शोधलाय हिरा!
उमरानला पुढच्या सामन्यात संधी मिळणार? वाचा काय म्हणाला कर्णधार पंड्या
दिपक हु्ड्डाच्या विस्फोटक खेळीनंतरही चहल का बनला सामनावीर? जाणून घ्या कारण