मुंबई । आधुनिक क्रिकेटमध्ये भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू आहे. मधल्या फळीत खेळताना आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा रोहित सुरुवातीच्या काळात फारसा चमकला नाही. मात्र, सलामीची जबाबदारी त्याच्यावर दिल्यानंतर एक वेगळाच रोहित शर्मा जागतिक क्रिकेटला पाहता आला. दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठान याने रोहित शर्मा विषयी एक विधान केले आहे.
इरफान पठाणच्या मते, रोहित आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रचंड मेहनत घेत होता. मात्र, त्याच्या चेहर्यांवरचे हावभाव पाहून असे वाटायचे की फलंदाजी करताना खूप शांत आहे. त्यामुळे लोकांना तो मेहनत घेत नसल्यासारख वाटायचं.
पठण स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टटेड’ या कार्यक्रमात बोलताना म्हणाला की,”अनेक लोकांचा गैरसमज व्हायचा. त्यांना वाटायचं रोहितकडे खूप वेळ आहे. तो मेहनत करत नाही.”
“ज्या खेळाडूंकडे खूप वेळ असतो त्यांच्याकडे पाहून अनेक लोकांचा गैरसमज होतो. ते रोहित पेक्षाही जास्त निवांत असतात. तेव्हा आपण म्हणतो की, याला जास्त मेहनत करण्याची गरज आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसिम जाफर यांच्याबाबतीतही असेच बोलले जायचे,” असेही इरफान पठाणने सांगितले.
भारताकडून 2003 ते 2008 पर्यंत 29 कसोटी खेळणाऱ्या 35 वर्षीय पठाण म्हणाला की, “रोहित शर्मा नेहमीच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करतो. म्हणून तो एक फलंदाज आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरला. तो सतत परिश्रम करायचा आणि करतो. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जे निकाल दिले ते पाहून ही गोष्ट नक्कीच सिद्ध होते.”