वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने पूर्ण केल्यावर शुक्रवारी (1 ऑगस्ट) भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली. यानंतर भारतीय क्रिकेटमधील संबंधित व्यक्तींनी बुमराहचा पुढील आंतरराष्ट्रीय सामना कोणता असेल यावर चर्चा सुरू केली आहे.
31 वर्षीय बुमराहने या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये एकूण 119.4 षटकं टाकून 14 विकेट्स घेतल्या. बीसीसीआयने (BCCI) अधिकृत निवेदनात म्हटलं, पाचव्या टेस्टसाठी बुमराहला भारतीय संघातून रिलीज करण्यात आलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात हेडिंग्ले येथे आणि तिसऱ्या टेस्टमध्ये लॉर्ड्सवर बुमराहने दोन वेळा 5 विकेट घेतल्या.
मँचेस्टरमध्ये बुमराहने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात 100 हून अधिक धावा दिल्या. आता बुमराहच्या खात्यात 48 कसोटी सामन्यात एकूण 219 विकेट्स झाल्या आहेत. भारत दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी, निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर (Ajit Agarkar) यांनी सांगितलं होतं की, वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे बुमराह तीनपेक्षा अधिक कसोटी सामने खेळणार नाही.
भारताचा पुढचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आशिया कप (Asia Cup 2025) टी20 स्पर्धा आहे. पण जर बुमराह यामध्ये खेळण्याचा निर्णय घेतो, तर तो थोडा धक्कादायक ठरेल, कारण वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका आशिया कप संपल्यानंतर आठवडाभरातच सुरू होणार आहे.
आशिया कप (Asia Cup) 29 सप्टेंबरला संपेल आणि त्यानंतर लगेच 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी सुरू होईल. दुसरी कसोटी 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीमध्ये होईल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने होणार आहेत.
भारतीय निवड प्रक्रियेशी जवळून संबंधित असलेल्या बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, हा एक कठीण निर्णय असेल, कारण बुमराहला कसोटी क्रिकेट फार आवडतं आणि सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉइंट्सही महत्वाचे आहेत. टी20 बाबतीत, तो जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळू शकतो, जी टी20 वर्ल्ड कपसाठी सरावाची संधी असेल.
जर बुमराहने आशिया कप खेळला आणि भारताने अंतिम सामना गाठला, तर तो वेस्ट इंडिजविरुद्धचा अहमदाबाद कसोटी गमावू शकतो. प्रश्न असा आहे की, बुमराहला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवायचं आहे की त्याला आशिया कप खेळू द्यायचं आणि नंतर थेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळू द्यायचं? हे निर्णय अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना घ्यावे लागतील.
वनडे सामने फारसे खेळण्याची शक्यता नाही, कारण भारतातच होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.






