भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये चौथा कसोटी सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाने आजपर्यंत एकदाही विजय मिळवलेला नाही. भारताने येथे पहिला सामना 1936 मध्ये खेळला होता. तेव्हापासून 89 वर्षांमध्ये भारताला इथे एकदाही विजय मिळालेला नाही.
या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण 9 सामने झाले आहेत. विशेष म्हणजे या 9 पैकी भारताने एकदाही सामना जिंकलेला नाही. भारत 5 सामने ड्रॉ करण्यात यशस्वी ठरला, तर 4 वेळा पराभव स्वीकारावा लागला. पण यंदा भारताला 89 वर्षांचा हा विजयाचा दुष्काळ संपवण्याची मोठी संधी आहे.
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय कामगिरी:
एकूण सामने: 9
विजय: 0
पराभव: 4
ड्रॉ: 5
शुबमन गिलच्या (Shubamn Gill) नेतृत्वात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणाऱ्या भारताने याआधी एजबॅस्टन मैदानावर इतिहास रचला होता. भारताने तिथे 58 वर्षांत एकदाही सामना जिंकलेला नव्हता. त्या मैदानावर भारताने 7 सामने गमावले होते आणि 1 ड्रॉ केला होता. पण के.एल. राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आकाशदीप, मोहम्मद सिराज आणि कर्णधार शुबमन गिल यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने अखेर 58 वर्षांत पहिला विजय मिळवला.
भारत आणि इंग्लंड संघातील ही 5 सामन्यांची कसोटी मालिका आहे. पहिला सामना लीड्समध्ये झाला होता, जिथे भारताचा पराभव झाला. दुसरा सामना एजबॅस्टनमध्ये झाला आणि तिथे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. तिसरा सामना लॉर्ड्सवर झाला, जिथे पुन्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता चौथा सामना मॅंचेस्टरमध्ये, तर पाचवा सामना ओव्हलमध्ये होणार आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. सध्या भारत मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे.






