आगामी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत एकदिवसीय स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत अंतिम निर्णय भारत सरकारने घ्यायचा आहे.
कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाच्या पार्श्वभूमीवर राजीव शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, “याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी नेहमीच सरकारची परवानगी घेण्याचे आमचे धोरण आहे. आमच्या संघाने कोणत्याही देशाचा दौरा करायचा की नाही? हे सरकार ठरवते. या बाबतीतही सरकार जो काही निर्णय घेईल, आम्ही त्याचे पालन करू.”
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात. पाकिस्तानचा संघ 7 वर्षानंतर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर आला होता, तर आशिया चषकाचा शेवटचा हंगाम ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयसने वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत निवड समितीवर साधला निशाणा; लिहिले, “मेहनतीची…”
कोहलीच्या आरसीबीवर खूप रागावला होता धोनी, माजी खेळाडूने सांगितली आतली गोष्ट
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! पुन्हा मैदानावर दिसणार सचिनच्या बॅटची जादू, ‘या’ लीगमध्ये खेळणार