मर्यादीत षटकांचा भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या श्रीलंका दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावरील प्रशिक्षक राहुल द्रविड आणि प्रभारी कर्णधार शिखर धवनने आपले मत मांडले आहे. त्यांनी श्रीलंका टी-२० मालिका का महत्वपूर्ण असेल याचे कारणही सांगितले आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेला राहुल द्रविड रविवारी म्हणाला की, मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडलेल्या सर्व युवा खेळाडूंना सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी युवा खेळाडू निवडकर्त्यांना आपल्या कामगिरीने प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे या दौऱ्यात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वात युवा संघ श्रीलंकेचा दौरा करेल, ज्यात आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले असे सहा खेळाडू आहेत. नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा प्रमुख द्रविडने संघ श्रीलंका जाण्यापूर्वी म्हणाला, ‘मला वाटते की या छोट्या दौर्यावर आमच्याकडून अपेक्षा करणे बहुधा कठीण ठरेल की प्रत्येकाला तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी दिली जाईल. भारतीय निवडकर्तेही या दौऱ्यावर असतील.’
यावर्षीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या संघात स्थान मिळण्यासाठी ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे ३ खेळाडू दावेदार असतील. श्रीलंका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिका १३ जुलै पासून चालू होईल. त्यानंतर २१ जुलै पासून टी-२० सामने खेळले जातील.
यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या पूर्वी भारतीय संघाची ही शेवटची टी२० मालिका असेल. हा विश्वचषक संयुक्त अरब अमिराती येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडेल. हा विश्वचषक खरंतर भारतात होणार होता. मात्र, भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहाता, ही स्पर्धा युएईला हलवण्यात आली.
त्याचमुळे श्रीलंकेतील एकदिवसीय सामन्यांपेक्षा तीन टी-२० सामने महत्त्वाचे ठरणार आहेत कारण विश्वचषक होण्यापूर्वी भारताचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. माजी भारतीय कर्णधार म्हणाला, “या संघात असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांना येत्या विश्वचषकासाठी संघात आपले स्थान निश्चित करायचे आहे पण मला वाटते की संघातील प्रत्येकाचे मुख्य लक्ष्य हे मालिका जिंकण्यावर असेल. ”
तो म्हणाला “मालिका जिंकणे हे मुख्य उद्दीष्ट आहे आणि आशा आहे की खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त तीन टी-20 सामने आहेत. मला खात्री आहे की निवडकर्त्यांना आणि व्यवस्थापनाला आतापर्यंत कोणत्या प्रकारचा संघ हवा आहे याची कल्पना आली असावी. ”
महत्वाच्या बातम्या
सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल
अमेरिकेचा ‘हा’ धावपटू भविष्यातील ‘वेगाचा बादशाह’? वयाच्या १७ व्या वर्षी मोडलाय उसेन बोल्टचा विक्रम
भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी






