भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर -गावसकर मालिकेमध्ये कर्णधार अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करत संपूर्ण क्रिकेट विश्वात भारतीय क्रिकेटची प्रतिमा उंचावली आहे. ॲडीलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होत होती. मालिकेत भारतीय संघाचे पुनरागमन जवळजवळ अशक्य असल्याचे मानले जात होते. मात्र प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत व विराट कोहलीची पालकत्व राजादेखील अजिंक्यसेनेला रोखू शकली नाही व संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व क्रिकेट विश्वाकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. अशातच इंग्लंडचा कर्णधार जो रूटने देखील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या असून, आगामी भारत- इंग्लंड मालिका रोमांचक होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
रूट म्हणाला ,”भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत उत्कृष्ट होती. या मालिकेमध्ये शानदार क्रिकेट बघायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी ज्याप्रकारे संघर्ष केला त्यातून स्पष्ट होते की भारतीय क्रिकेटमधील नवोदित खेळाडूंमध्ये क्षमता आहेत. एक क्रिकेट प्रेक्षक म्हणून अशा प्रकारची कसोटी मालिका बघणे आनंददायी होते. तसेच आम्ही जेव्हा भारतात मालिका खेळू तेव्हा ती देखील याच प्रकारे रोमांचक असेल.”
रूट पुढे म्हणाला ,”मला आशा आहे की भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला असेल. भारतीय संघ सर्वोत्तम आहे व त्यांना माहित आहे की आपल्या मायभूमीत कशाप्रकारे उत्तम कामगिरी करायची. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. मात्र, तरीदेखील ही मालिका रोमांचक असेल.”
आगामी काळात इंग्लंड संघ भारतात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या मालिकेकडे लागले आहे. इंग्लंडने नुकत्याच श्रीलंका विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत 7 विकेटने विजय मिळवला होता. त्यामुळे इंग्लंडच्या समर्थकांना आशा असेल की ते भारतात देखील या कामगिरीची पुनरावृत्ती करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
“घरी येताना चांगले कपडे घालून ये”, भारतात परतल्यानंतर रहाणेला बायकोची ऑर्डर, जाणून घ्या कारण
कृणाल पंड्याबरोबर झालेला वाद आला अंगाशी; दीपक हुडावर झाली मोठी कारवाई
कबड्डी स्पर्धेदरम्यान धक्कादायक घटना! चालू सामन्यात डोक्यावर आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू