ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. या विश्वचषकात यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. भारतीय संघ बारा वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करेल. अशात आता भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष के श्रीकांत यांनी रवींद्र जडेजा याला या विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू म्हटले आहे.
आगामी विश्वचषकात अष्टपैलू रवींद्र जडेजा याला संधी मिळणे निश्चित आहे. तो संघाचा सर्वात अनुभवी अष्टपैलू असून, खेळाच्या तीनही विभागात योगदान देऊ शकतो. त्याला भारताच्या विश्वचषक मोहिमेतील एक महत्त्वाचा खेळाडू मानले जाते. असे असतानाच श्रीकांत यांनी देखील या शब्दाचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले,
“भारतीय संघाकडे विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे. यावेळी रवींद्र जडेजा हा भारतीय संघासाठी युवराज सिंगने जी कामगिरी 2011 मध्ये केली होती तशी कामगिरी करू शकतो. त्याचा अनुभव देखील आता दांडगा झाला असून, आपल्या घरच्या मैदानांवर खेळताना त्याला निश्चित फायदा होईल.”
युवराज सिंग हा 2011 विश्वचषकात मालिकावीर ठरलेला. त्या संपूर्ण स्पर्धेत त्याने कॅन्सरशी झुंज देत भारताला विजेता बनवण्यात सिंहाचा वाटा उचललेला. त्याने 300 पेक्षा अधिक धावा करताना 15 बळी देखील मिळवले होते. त्याच्याप्रमाणेच जडेजा हा देखील डावखुऱ्या हाताचा फलंदाज व फिरकी गोलंदाज आहे. तो भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघात खेळत असतो. त्यामुळे खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना हार्दिक पंड्यासह तो फिनिशरची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. तसेच भारताच्या फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व देखील तोच करेल.
(K Srikanth Hoping Ravindra Jadeja Replicate Yuvraj Singh 2011 World Cup Performance For India)
महत्वाच्या बातम्या
आज मिळणार MPL चा महाविजेता! रत्नागिरी-कोल्हापूर अंतिम सामन्यात झुंजणार