जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून ८ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. अनेक चाहत्यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीवर या पराभवाचे खापर फोडले आहे. तसेच त्याला कर्णधारपदावरुन हटवण्याची देखील मागणी केली आहे. मात्र यावेळी दिग्गज पाकिस्तानी खेळाडू कामरान अकमलने विराट कोहलीची पाठराखण केले आहे.
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवासाठी त्याला दोषी ठरवले जाऊ शकत नाही, असे अकमलने म्हटले आहे. साऊथॅंप्टनमध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडकडून ८ विकेट्सने पराभव झाल्याने कोहलीचे नेतृत्व कौशल्य आणि त्याच्या कामगिरीवर प्रश्न उमटत आहेत. आयसीसीची ही तिसरी स्पर्धा होती जेथे त्याच्या नेतृत्वात भारत जिंकण्यात अपयशी ठरला. त्यामुळे नेतृत्वबदलाची मागणी केली जात आहे. मात्र अकमलने ‘दुसरा कोणताही कर्णधार भारतासाठी आयसीसी करंडक जिंकेल याची हमी कोणी देऊ शकेल का?’, असा परखड सवाल केला आहे.
विराट कोहली हा एक महान कर्णधार आहे आणि त्याने भारताचा कर्णधार म्हणून कायम राहावे, असे कामरान अकमलचे मत आहे. एका यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला की, “विराट कोहली एक महान खेळाडू आणि एक महान कर्णधार आहे. तो आक्रमक आणि खूप भावनिक आहे. कोणत्याही कर्णधाराने भारतीय क्रिकेटला पुढे नेले आहे. त्याची सुरुवात सौरव गांगुली, त्यानंतर राहुल द्रविड आणि एमएस धोनी यांनी केली. होय, प्रत्येकाची तक्रार आहे की विराट कोहलीने कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही, परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने बऱ्याच मालिका जिंकल्या आहेत. कोहलीचे नशीब थोडे खराब आहे , परंतु मला त्याच्या नेतृत्वावर कोणतीच शंका नाही. तो एक महान आणि सामना जिंकवणारा खेळाडू आहे.”
अकमल पुढे म्हणाला की, “संघ व्यवस्थापनाला याबाबत विचार करावा लागेल की ते मोठ्या स्पर्धा का जिंकत नाही आहे. यात विराट कोहलीची काहीही चूक नाही. दुसरा कर्णधार येऊन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देईल, याची शाश्वती काय? एक संघ म्हणून त्यांना विचार करावा लागेल की मोठ्या स्पर्धा कशा प्रकरे जिंकाव्या. ते अंतिम सामान्यांपर्यंत पोहोचतात परंतु अंतिम सामन्यात त्यांना विजय मिळवता येत नाही. फक्त विराटला यासाठी दोषी ठरवणे चुकीचे आहे.”
महत्वाच्या बातम्या:
म्हणून समालोचन करण्याचा घेतला निर्णय, दिनेश कार्तिकने खास पोस्टसह केला खुलासा
टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार
सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक






