येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाने वृद्धीमान साहाला देखील भारतीय संघात स्थान दिले आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी वृद्धीमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. तो आता ठीक असला तरीदेखील बीसीसीआय याबाबत कुठलीही जोखीम घेणार नाहीये. त्यामुळे बीसीसीआय वृद्धीमान साहाचा बॅकअप खेळाडू म्हणून आंध्रप्रदेशच्या तुफान फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाला संधी देऊ शकते.
एएनआयला एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “यष्टीरक्षण हे विशेष काम आहे. वृद्धिमान साहा कोरोनातून बरा होत आहे. अशा परिस्थितीत तो वेळेवर फिट झाला नाही तर संघाला आणखी एक यष्टीरक्षक आवश्यक असेल. कारण हा दौरा जवळपास तीन महिन्यांचा आहे. त्यामुळे बीसीसीआय वृद्धिमान सहाचा बॅकअप खेळाडू म्हणून केएस भरत याला इंग्लंडला पाठवू शकते.”
केएस भरत हा देखील उत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे. माहितीनुसार बीसीसीआयला कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नाही. त्यामुळे ते केएस भरतची निवड करण्याच्या विचारात आहेत. वृद्धिमान साहाव्यतिरिक्त रिषभ पंतलाही संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक झळकावले आहे.
सर्व खेळाडू मुंबईमध्ये एकत्र येणार
आयपीएल २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआय या वेळेस कुठल्याही गोष्टीत कमतरता भासू देणार नाहीये. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व खेळाडू थेट इंग्लंडला न जाता आधी मुंबईत एकत्र येऊन १४ दिवस विलागिकरणात राहणार आहेत. त्यानंतर २ जूनला सर्व खेळाडू इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत.
अशी आहे केएस भारतची कामगिरी
देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आंध्रप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केएस भरतच्या नावे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक आहे. त्याने ७८ प्रथम श्रेणी सामन्यात ३७ च्या सरासरीने ४२८३ धावा केल्या आहेत. यात ३०८ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच त्याला ९ शतक आणि २३ अर्धशतक करण्यात यश आले आहे. तसेच लिस्ट ए कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५१ सामन्यात १३५१ धावा केल्या आहेत. यात ३ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच ४८ टी -२० सामन्यात त्याने ७३० धावा चोपल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये एकाच षटकात ५ खणखणीत षटकार ठोकत प्रकाशझोतात आलेला ‘राहुल तेवतिया’
क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! ‘ही’ मानाची स्पर्धा झाली रद्द, जून महिन्यात होणार होते आयोजन