जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जातो आहे. भारत आणि न्यूझीलंड हे विद्यमान क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करतांना भारतीय संघ २१७ धावांवर सर्वबाद झाला.
न्यूझीलंड संघाने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन करतांना भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करु दिली नाही. न्यूझीलंडतर्फे वेगवान गोलंदाज कायले जेमिसन पाच बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. हे पाच बळी घेत त्याने काही खास विक्रम देखील आपल्या नावे केले.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ‘हा’ विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आयोजित केलेली ही पहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गेल्या दोन वर्षांपासून खेळवली जात आहे. या स्पर्धेत फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी विविध विक्रम नोंदवले आहेत. कायले जेमिसनने देखील या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खास विक्रम नोंदवला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध पाच बळी घेत या स्पर्धेत तो सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला.
अंतिम सामन्यातील पाच बळी हे जेमिसनचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पाचव्यांदा मिळवलेले पाच बळी ठरले. या यादीत त्याने भारताचे फिरकीपटू आर अश्विन, अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनला मागे टाकले. या तिघांच्या नावे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी चार वेळा पाच बळींची नोंद आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारे गोलंदाज –
१) कायले जेमिसन – ५*
२) आर अश्विन – ४
३) नॅथन लॉयन – ४
४) अक्षर पटेल – ४
जेमिसनची भेदक गोलंदाजी
आपल्या कसोटी कारकिर्दीतील अवघा आठवा सामना खेळणाऱ्या कायले जेमिसनने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात लाजवाब कामगिरी केली. त्याने भारताची फलंदाजी फळी कापून काढतांना पाच बळी घेतले. ज्यात कर्णधार विराट कोहलीच्या महत्वपूर्ण बळीचाही समावेश होता. त्याच्या या कामगिरीने भारताला २१७ धावांमध्ये रोखणे, न्यूझीलंडला शक्य झाले.
महत्त्वाच्या बातम्या:
तब्बल १५ वर्षानंतर या देशात भारतीय महिला खेळणार कसोटी, क्रिकेट बोर्डाने दिली या गोष्टीची शाश्वती
जेमिसनच्या ‘पंच’ने भारत घायाळ, किवी गोलंदाजाने नावे केला ‘हा’ विक्रम
भारतीय संघाने केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळे लायनवर जळतो रॉस टेलर