एमएस धोनीचे नाव जगातील महान कर्णधारांमध्ये घेतले जाते. याला कारणेही तशीच आहेत. टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाचे कौशल्य दाखवलेय. धोनीच्या कर्णधारपदाबद्दल अनेकांनी म्हटले आहे की, खेळाडूंकडून सर्वोत्तम कसे काढायचे हे त्याला माहीत आहे. याच क्षमतेमुळे, त्याला सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे मार्गदर्शक (मेटर) बनवण्यात आले. मात्र, या नव्या भूमिकेत तो कितपत यशस्वी ठरेल याबाबत धोनीचा माजी संघसहकारी व चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी याने महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला बालाजी?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बालाजी म्हणाला,
“धोनी दोन वर्षांपूर्वी याच संघाचा भाग होता. त्यामुळे धोनीसाठी हे सर्वं नवीन नसेल. मी धोनीला चांगले ओळखतो म्हणून मी असे म्हणू शकतो की, तो एक असा व्यक्ती आहे जो सीमा ओलांडत नाही. त्याने बर्याच वर्षांपासून स्वतःला सिद्ध केले आहे. कोणीही त्याच्याकडे जाऊन खेळाबद्दल बोलू शकतो. धोनीचे वलय नेहमीच राहील. मात्र, कोणत्याही वयोगटातील खेळाडू त्याच्याशी संवाद साधू शकतात.”
बालाजीने पुढे सांगितले,
“धोनीला कनिष्ठ आणि वरिष्ठांमधील अंतर कसे मिटवायचे हे माहित आहे. मी गेल्या दीड दशकात धोनीला एक कर्णधार म्हणून पाहिलेय. प्रथम चेन्नईचा खेळाडू म्हणून आणि नंतर चेन्नईसाठी सपोर्ट स्टाफमध्ये काम करताना मला याचा अनुभव आला आहे. तो मेंटर म्हणून भारतीय संघासाठी उपयुक्त आणि सफल होईल यात शंका नाही.”
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यावर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून नियुक्त केले आहे.






