टी२० विश्वचषकाचा थरार सुरू झाला आहे. यावेळी स्पर्धेत भारत आणि वेस्टइंडिज सारख्या बलाढ्य संघांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. वेस्ट इंडिजला पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा चाहत्यांना षटकार आणि चौकारांची अपेक्षा असते. वेस्ट इंडिजच्या वेगवान फलंदाजीमुळे प्रतिस्पर्ध्याचे गोलंदाजही तणावात राहतात. पण टी२० विश्वचषक २०२१ च्या १८ व्या सामन्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर लेंडल सिमन्सने दुबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी संथ खेळी खेळली, की ज्यामुळे त्याच्या संघाचे नुकसान तर झालेच पण त्याचबरोबर त्याची खिल्लीही उडवली जात आहे.
लेंडल सिमन्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५ चेंडूत फक्त १६ धावा केल्या. सिमन्स सलामीला आला आणि १४ व्या षटकात बाद झाला. मात्र, यादरम्यान सिमन्सच्या बॅटमधून एकही चौकार किंवा षटकार आला नाही. सिमन्सचा स्ट्राईक रेट फक्त ४५.७१ इतका होता. लेंडल सिमन्सच्या संथ खेळीमुळे वेस्ट इंडिजला चांगलाच फटका बसला. वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १४३ धावा करू शकला. समालोचन करणारा भारतीय समालोचक आकाश चोप्रा याने हा माझ्यासारखी कसोटी फलंदाजी करत असल्याचे म्हटले होते.
अनेक नकोस विक्रम झाले नावे
सिमन्स टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात संथ फलंदाज ठरला आहे. किमान २५ चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये एमएस धोनीचे नाव सर्वात वर होते. त्याने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ चेंडूत केवळ ९ धावा केल्या होत्या. आता हा नकोसा विक्रम लेंडल सिमन्सच्या नावावर झाला आहे. टी२० विश्वचषकात सर्वाधिक चेंडू खेळून एकही चौकार न मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही सिमन्सचा समावेश झाला आहे. सिमन्सने ३५ चेंडूत एकही चौकार किंवा षटकार मारला नाही. मॅथ्यू क्रॉसनेही याच विश्वचषकात ओमानविरुद्ध ३५ चेंडूंत एकही चौकार लगावला नव्हता.
मागील विश्वचषकात भारताला केले होते स्पर्धेबाहेर
सिमन्स त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. २०१६ च्या टी२० विश्वचषकात सिमन्सनेच भारतीय संघाला स्पर्धेबाहेर केले होते. ज्याच्या तुफानी फलंदाजीपुढे भारतीय संघ हतबल झाला होता. २०१६ च्या टी२० विश्वचषक उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना भारताने १९२ धावा केल्या होत्या, परंतु सिमन्सच्या ५१ चेंडूत नाबाद ८२ धावांच्या जोरावर विंडीजने विजय मिळवला होता. सिमन्सने आपल्या खेळीत भारताविरुद्ध ५ षटकार आणि ७ चौकार मारले होते.