आज (8 मार्च) मेलबर्न येथे महिला दिनाच्या मुहूर्तावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (INDWVsAUSW) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने आणि ऑस्ट्रेलिया संघाने ११ जणींच्या संघात एकही बदल केलेला नाही. त्यामुळे श्रीलंका विरुद्ध खेळलेल्या ११ जणींचा भारतीय संघच या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.
भारतीय संघाची टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाने याआधी खेळलेल्या ५ अंतिम सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवत विश्वविजेतेपद जिंकले होते. त्यामुळे ते आज ५ वे विजेतेपद जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. तर भारतीय संघ पहिले टी२० विश्वविजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने आज मैदानात उतरेल.
अंतिम सामन्यासाठी असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – शेफाली वर्मा, स्म्रीती मंधाना, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), जेमीमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड.
ऑस्ट्रेलिया – एलिसा हेली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), रॅचेल हेन्स, ऍश्ले गार्डनर, सोफी मोलिनेक्स, निकोला कॅरी, जेस जोनासेन, जॉर्जिया व्हेरहॅम, डेलिसा किमिन्स, मेगन शट