सोमवारी (28 सप्टेंबर) दुबईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा युवा प्रतिभावान फलंदाज ईशान किशन (99 धावा) याने उत्कृष्ट फलंदाजी केली.
मुंबईला विजयासाठी शेवटच्या 30 चेंडूंत 90 धावांची गरज होती. ईशान आणि टी20 चा स्टार फलंदाज कायरन पोलार्ड (नाबाद 60) यांनी तुफान फटकेबाजी केली. अखेरच्या दोन चेंडूंमध्ये मुंबईला पाच धावांची गरज होती. 20 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ईशान झेलबाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर पोलार्डने चौकार मारला. यामुळे सामना बरोबरीत सुटला.
त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये एबी डिविलियर्ससोबत फलंदाजी करायला का आलो याचे कारण विराटने सांगितले आहे. सुपर ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी केल्याबद्दल युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचेही त्याने कौतुक केले.
मैदान मोठे असल्यामुळे चौकार मारणे होते कठीण
सामन्यानंतर विराट म्हणाला, “सुपर ओव्हरमध्ये एबी डिविलियर्ससह फलंदाजी करायला आलो, कारण आम्ही सहजपणे दोन धावा काढू शकतो. मला वाटले की जसप्रीत बुमराह गोलंदाजी करेल आणि मैदान मोठे असल्यामुळे चौकार मारणे कठीण होते. त्यामुळे मी विचार केला की असे कोण फलंदाज आहेत जे धावून सहजपणे दोन धावा काढू शकतात. ते दोन फलंदाज म्हणजे मी आणि डिविलियर्स, असे मला वाटले.”
सैनीने केली शानदार गोलंदाजी
युवा गोलंदाज नवदीप सैनी बद्दल बोलतांना विराट म्हणाला, “हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांच्या विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये सैनीने शानदार गोलंदाजी केली. मैदान मोठे होते त्यामुळे चौकार मारणे कठीण होते. म्हणून सैनीला यॉर्कर चेंडू टाकू शकतो याचा आत्मविश्वास होता. तो वेगाने चेंडू फेकू शकतो, तो वाईड यॉर्करही चांगला टाकतो.”
पोलार्ड आणि ईशानने विजयाच्या आशा ठेवल्या कायम
सामन्यात मुंबईने पुनरागमन केले होते. याचे श्रेय कोहलीने ईशान किशन आणि कायरान पोलार्ड यांना दिले. तो म्हणाला, “सामन्यात खूप चढ उतार आले. आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आणि 200 पेक्षा जास्त धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीची सुरुवात चांगली झाली. ईशान आणि पोलार्ड हे दोघेही चांगले खेळले आणि मैदानात दव पडल्यामुळे त्यांना मदत मिळाली. त्यांनी शानदार फलंदाजी करत मुंबईच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल.”